Monday, August 3, 2026
Latest NewsPUNE

भारतीय ज्ञान परंपरा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे – डॉ. गंटी मूर्ती

पुणे : भारतीय ज्ञान परंपरा ही कला, संस्कृती आणि विद्येचा महासागर आहे. परंतु शेकडो वर्षांच्या पाश्चात्य आक्रमणामुळे पाश्चात्य शिक्षणाचा आणि परंपरेचा प्रभाव आपल्या मनावर राहिला आहे, त्यामुळे भारतीय ज्ञानपरंपरेपासून आपण दूर गेलो होतो आजच्या तरुणांना भारतीय संस्कृतीचे वैभव खऱ्या अर्थाने कळण्यासाठी भारतीय ज्ञान परंपरा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या भारतीय ज्ञान परंपरा विभागाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. गंटी मुर्ती यांनी व्यक्त केले.

मएसो सिनियर कॉलेज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भांडारकर विद्या संशोधन मंदिर यांच्यातर्फे भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. गंटी मूर्ती यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक, माजी खासदार प्रदीप रावत, भांडारकर संस्थेचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, भारतीय शिक्षण मंडळाचे सहसचिव महेश दाबक, विजय भालेराव, सीनियर कॉलेजचे प्राचार्य रवींद्र वैद्य, उपप्राचार्य डॉ. पुनम रावत यावेळी उपस्थित होते.

डॉ. गंटी मुर्ती म्हणाले, भारतीय संस्कृती जगातील एकमेव अशी संस्कृती आहे जी हजारो वर्षानंतरही आजही अस्तित्वात आहे, परंतु ही परंपरा मोठ्या प्रमाणावर आज मंदिरे आणि केवळ ग्रंथालयांमध्येच अस्तित्वात आहे, ही परंपरा तेथून बाहेर पडून सर्वसामान्यांच्या आयुष्याचा एक भाग बनले पाहिजे. जर भारतीय ज्ञान परंपरा सर्वसामान्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनली, तरच ही वैभवशाली परंपरा आपण पुढील पिढीपर्यंत पोहोचवू शकतो.

डॉ.पराग काळकर म्हणाले, आपल्या संस्कृती वरील विश्वास कमी करण्याचे महत्त्वाचे काम आक्रमकानी  केले. त्यामुळेच नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठे उध्वस्त करण्यात आली. आज गावातील शिक्षण हे शहरांमध्ये आणून ते सर्वसामान्यांना परवडण्याच्या पलीकडे गेले आहे. त्यामुळेच आज भारतीय ज्ञान परंपरा गरजेची आहे  केवळ पाश्चात्यांच्या दृष्टिकोनातून आपण पाहण्याची स्वतःला सवय लावल्यामुळे आपण आपल्याच भारतीय ज्ञान परंपरेला विसरलो आहोत.

महेश दाबक म्हणाले, भारतीय ज्ञान परंपरेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक करण्याची गरज आहे. आजच्या तरुणांना त्यांच्या करिअरमध्ये भारतीय ज्ञान परंपरा कशाप्रकारे उपयोगात आणता येऊ शकते हे जर आपण त्यांना लक्षात आणून दिले, तर तेच तरुण ही परंपरा पुढे नेऊ शकतात.

भूपाल पटवर्धन म्हणाले, आजपर्यंत संशोधन क्षेत्रांमध्ये भारतीय कमी पडत होते. परंतु भारतीय ज्ञान परंपरा जर समाजाच्या तळागाळापर्यंत पोचली तर निश्चितच विद्यार्थी संशोधनावर अधिक लक्ष केंद्रित करतील. भारताच्या वैभवशाली परंपरेच्या इतिहासाला आजच्या वर्तमानाशी जोडून उद्याचे भविष्य उज्वल करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य भारतीय ज्ञान परंपरा करू शकेल.

प्रदीप रावत म्हणाले, विविध क्षेत्रांमध्ये आणि विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये भारतीयांनी मोठे योगदान दिले आहे. परंतु पाश्चात्यांच्या पगड्यामुळे आपण त्यांचे योगदान विसरत चाललो आहोत. भारतीयांनी केवळ भारताच्याच विकासामध्ये नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये कशाप्रकारे योगदान दिले आहे हे आजच्या तरुणांना कळणे गरजेचे आहे, त्यासाठीच भारतीय ज्ञान परंपरा ही विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पोहोचली पाहिजे.

रवींद्र वैद्य म्हणाले, भारतीय ज्ञान परंपरेचा अधिक प्रचार आणि प्रसार होईल यासाठी नवीन शैक्षणिक धोरणांच्या माध्यमातून अभ्यासक्रम तयार करणे गरजेचे आहे, तरच आजच्या विद्यार्थ्यांना भारताची प्राचीन आणि गौरवशाली परंपरा काय होती हे कळू शकेल.

प्रदीप नाईक म्हणाले, भारतीय ज्ञान परंपरा अतिशय समृद्ध आहे. नवीन ज्ञान परंपरा निर्माण करून भारतीय विद्यार्थ्यांना विज्ञान आणि संशोधनाकडे वळविणे गरजेचे आहे. केवळ पाश्चात्य शिक्षण व्यवस्था प्रमाण मानून त्यानुसारच आपली वाटचाल करण्यापेक्षा आपल्या ज्ञानपरंपरेत चा नवीन मापदंड आपण निर्माण केले पाहिजे.

या कार्यशाळेमध्ये पुणे व इतर कॉलेजमधील एकूण १७० हून अधिक प्राध्यापकांनी सहभाग घेतला
गौरी मोघे यांनी समारोपाचे भाषण केले. डॉ. सुरेखा वैद्य यांनी सूत्रसंचालन केले.  प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पुनम रावत यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading