Maratha Reservation : राज्य सरकार कडून मराठा समाजाची फसगत – विजय वडेट्टीवार
मुंबई : दोनदा न्यायालयाने नाकारलेले आरक्षण पुन्हा राज्य सरकार कडून निवडणुकीच्या तोंडावर जाहीर करण्यात आले आहे. केवळ निवडणुकांच्या तोंडावर मराठा समाजाची मते मिळविण्यासाठी राज्य सरकार कडून हे ढोल वाजवले जात आहेत. ही राज्य सरकार कडून मराठा समाजाची फसगत आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
विधानसभेत आज मराठा आरक्षणाला 10 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. त्यानंतरविजय वडेट्टीवार माध्यमांशी बोलत होते. विजय वडेट्टीवार म्हणाले, केवळ निवडणुकीत मराठा समाजाची मते घेण्यासाठी राज्य सरकारकडून हे आरक्षण देण्यात आले आहे. राज्य सरकारने ज्या आधारावर हे आरक्षण लागू केले आहे, ते आरक्षण यापूर्वी दोन वेळा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले आहे. त्यामुळे हे पुन्हा न्यायालयात टिकेल का? याची शंका आहे.
आजच्या अधिवेशनापूर्वी आम्ही सरकारला या आरक्षणाचे निकष आणि कायदेशीर बाबींवर प्रश्न विचारले होते. मात्र, शिंदे- फडणवीस सरकारने त्या पत्राला उत्तर दिलेले नाही. आज देखील अधिवेशनात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. शिवाय जरांगे पाटील यांनी केलेल्या आरक्षाच्या मागणीचा या विधेयकात उल्लेख नाही. त्यामुळे केवळ निवडणुकांच्या तोंडावर मराठा समाजाची मते मिळविण्यासाठी राज्य सरकार कडून हे ढोल वाजवले जात आहेत. ही राज्य सरकार कडून मराठा समाजाची फसगत आहे.
