Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात येणार- सुधीर मुनगंटीवार

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत आणि अफजलखान वधात महत्त्वाची भूमिका असलेली महाराजांची वाघनखं लवकरच भारतात येतील आणि लंडनमध्ये महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारण्यात येईल,असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

शिवप्रतापदिनानिमित्त नातूबाग मैदान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार (निवृत्त), मिलिंद एकबोटे, धीरज घाटे, सुनिल देवधर आदी उपस्थित होते.

मुनगंटीवार म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ठिकाणी त्यांच्या स्मृती राज्य सरकारच्यावतीने त्या जपल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज खरे लोकशाहीचे जनक आहेत. त्यामुळे संसद परिसरात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग उभारण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विनंती करण्यात येईल. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांचा नावे पोस्टाची तिकीटाचे अनावरण करण्यात येणार आहे. सिंदखेडराजा परिसर विकास कामांसाठी २५० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.

सांस्कृतिक विभागातर्फे छत्रपतींच्या जीवनावर आधारित आतापर्यंत २ पोस्टाची तिकीटे काढण्यात आली असून आणखी १० तिकीटे काढण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराज यांचे तिकीट काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यभिषेकाच्यावेळी काढलेले होन स्मृती म्हणून आरबीआयकडून काढत आहोत. ज्या दरबारात शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या आग्र्याच्या दरबारात शिवजयंती साजरी करण्यात आली. सर्व संकटातून मुक्त होण्याचा मार्ग शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यात आहे, हाच विचार घेऊन सर्वांनी पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले.

नवा उत्साह आणि नवी ऊर्जा घेण्यासाठी कार्यक्रमाला आल्याचे नमूद करून मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्फूर्ती मिळते. मोगल आक्रमण होत असताना त्यांच्या दैवी अवताराचे दर्शन घडले. भय, गर्व आणि वासनारहित समाज उभा राहावं, तो परकीय आक्रमणापुढे दबून जाऊ नये म्हणून त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या पराक्रमामुळे त्यांच्या काळात औरंगजेबालाही महाराष्ट्र जिंकता आले नाही. त्यांच्या अशा अलौकिक कार्यामुळे काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल.

या देशासाठी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, झाशीची राणी लक्ष्मीबाई आदर्श आहेत. हा देश सदाचारावर आणि आध्यात्मिक विचारावर चालतो,असेही ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी एअर व्हाईस मार्शल जयंत इनामदार (निवृत्त) यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्य भूषण वीर जिवा महाले पुरस्काराने मंत्री श्री.मुनगंटीवार यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading