ठाकरेंनी तेंव्हा आक्षेप घेतला नाही!चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
धाराशिव : २०१९ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचे खासदार व आमदार ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून आले होते, तेव्हा त्यांनी आक्षेप घेतला नाही, असा पलटवार भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
तुळजापूर येथे पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले,” कुठे कमी पडले असाल तर त्याचा विचार करावा, भाजपालाही कधी कधी पराजयाचा सामना करावा लागतो. ईव्हीएमवर आक्षेप घेणे योग्य नाही.
४५ जागांवर महायुती विजय निश्चित
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना समाजातील अखेरच्या व्यक्तिपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपाचे सुपर वॉरियर्स प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्रातील जनमत मोदींच्या बाजूने असून लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४५ जागांवर महायुती निश्चित विजय मिळवेल असा दावा बावनकुळे यांनी केला.
धाराशीव लोकसभा मतदारसंघ प्रवासात त्यांनी धाराशीव येथे सकाळी बार्शी, भूमपरांडा-वाशी आणि धाराशीव-कळंब आणि दुपारी तुळजापूर, उमरगा-लोहारा आणि औसा विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स तथा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
धाराशीव जिल्ह्यातील भाजपा सुपर वॉरियर्स या विजयाचे शिल्पकार ठरतील, असे सांगून ते म्हणाले, २०२४ मध्ये पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. यावेळी केवळ विजय नव्हे तर महाविजय साकारायचा आहे. हा निर्धार करूनच मी राज्यभरात दौरा करीत आहे. तीन राज्यात भाजपाने मिळविलेला विजय हा विजयाची गॅरंटी देणारा आहे. भाजपा सरकारच्या योजना अंतिम व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी दररोज तीन तास संपर्क करावा असे आवाहन श्री बावनकुळे यांनी सुपर वॉरियर्संना केले.
या प्रवासात त्यांच्यासोबत यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अजित गोपछडे,प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर,मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार राणा जगजीतसिंह पाटील, धाराशीवचे जिल्हाध्यक्ष संताजी पाटिल, माजी आमदार सुरजितसिंह ठाकूर, गुरुनाथ मगे, नितीन काळे, किरण पाटील, सुधीर पाटील, तुकाराम गोरे यांच्यासह सर्व प्रमुख पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- टिकणारे आरक्षण देणार
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याचा निश्चय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणारच. - शेतकऱ्यांना सुखी ठेव
महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आई तुळजाभवानीला साकडे घातले. शेतकऱ्यांना सुखी ठेव, अशी तुळजाभवानीकडे प्रार्थना केली.
