Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

आणि १९७१ ची भूज येथील युद्धभूमी साक्षात अवतरली….

पुणे  : भारताच्या इतिहासातील दैदीप्यमान विजयामागील लष्कराच्या तिन्ही दलांप्रमाणेच नागरी सहभागाचे विलक्षण कथन विंग कमांडर (निवृत्त) लक्ष्मण कर्णिक यांनी शनिवारी साध्या सोप्या शैलीत ऐकवले, तेव्हा श्रोत्यांमधील लहानथोर सारेच भारावून गेले. १९७१ च्या युद्धात भूज येथे पाकिस्तानी हवाईदलाने केलेल्या हल्ल्यात लष्कराच्या धावपट्टीचे झालेले नुकसान अत्यल्प काळात, आसपास बॉम्बफेक सुरू असताना, ज्या धैर्याने स्थानिक महिलांनी दुरुस्त केले, त्या वीरांगनांना साऱ्या सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना दिली.

पुण्यातील भाषा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था व गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था यांच्या सहकार्याने आयोजित कथायात्रेमध्ये झालेल्या ‘सीमेवरच्या पराक्रमगाथा’ या विषयावरील सत्रात लष्करी सेवेतील मान्यवरांनी उपस्थितांना वेगळ्या प्रकारच्या माहितीने समृद्ध केले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात हा उपक्रम झाला. भाषा फाउंडेशनच्या अध्यक्षा व कथायात्रेच्या रचनाकार स्वाती राजे, जयदीप राजे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कर्णिक म्हणाले, “भूज येथील हवाईदलाचा विमानतळ लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असल्याने, तो सदैव ऑपरेशनल (कोणत्याही क्षणी सुसज्ज) राखणे आवश्यक होते. मात्र, तत्कालीन युद्ध परिस्थितीत, पुरेसे प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळ उपलब्ध नव्हते. भूज येथील हवाईदलाच्या विमानतळाच्या धावपट्टीचे बॉंबहल्ल्यात झालेले नुकसान कमीतकमी वेळात दुरुस्त करणे महत्त्वाचे होते. अशा वेळी भूजपासून १० किलोमीटर अंतरावरील माधोपूर या गावातील सुमारे २५० महिलांनी व काही पुरुषांनी भारतीय लष्कराला मदतीचे आश्वासन दिले. आसपास बॉम्बफेक होत असतानाही, या वीरांगना धावपट्टीची दुरुस्ती करण्यासाठी अथक योगदान देत राहिल्या. ठरल्या वेळात त्यांनी धावपट्टीची दुरुस्ती पूर्ण केली. सुदैवाने तेथे कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, या महिला खऱ्या अर्थाने वीरांगना आहेत. युद्धाच्या विजयगाथांमध्ये त्यांच्या योगदानाची गीते नसतील, पण त्या क्षणी त्यांच्यासोबत काम केलेल्या आम्हाला त्याची जाणीव आहे

भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट ७५ चे सदस्य असलेले कमांडर पराग तिवारी यांनी समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षेविषयीची माहिती दिली. नौदलाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या लष्कराच्या आस्थापना सागरी सीमांचे रक्षण, देखभाल करतात,. त्यांना विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या आणि राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्लिष्ट भू-राजकीय आव्हानांचा सामना करावा लागतो. ‘२६ – ११ च्या घटनेनंतर नौदलाने केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारची सुरक्षा यंत्रणा नव्याने विकसित केली आहे आणि मोठ्या प्रमणात गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच गुप्तहेर यंत्रणेमार्फत योग्य माहिती मिळवण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सागितले.

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) एस अँड सी विभागाचे कमांडंट नवीन अहलावत यांनी देशाच्या सीमावर्ती व अत्यंत दुर्गम भागातील रस्ते बांधणीची माहिती यावेळी उपस्थितांना दिली. उणे ५० अंश ते ५० अंश सेल्सिअस, अशा पराकोटीच्या विषम हवामानात रस्ते बांधणी, बोगदा तयार करणे, पूल बांधणे अशी दळणवळणासाठी अत्यंत महत्वाच्या पायाभूत सोयीसुविधा निर्माण कारण येणाऱ्या अडचणींवर मात करत संस्थेच्या अतुलनीय कामगिरी बद्दल उपस्थितांना अवगत केले. ते म्हणाले की जगभरात सर्वात उंच ठिकाणी मोटारगाडी जावू शकणाऱ्या पास पैकी १० भारतात असून त्याची निर्मिती बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने केली आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

राष्ट्र निर्माणाच्या या कार्यात आता महिला देखील हातभार लावत असून त्यांना (बीआरओ) आता उच्च पदांवर काम करण्याची संधी देत आहे व महिला देखील उत्तुंग कामगिरी करत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे लदाख सारख्या अत्यंत कठीण हवामानाचा सामना करण्यारा भागात नेहमीपेक्षा ४० दिवस अधिक तेथील पास सुरू ठेवण्यात बीआरओने यश मिळवल्याने विषम काळात दळणवळणावर येणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमणात बचत होत आहे, अशी माहिती अहलावत यांनी दिली.

‘सीमेवरच्या पराक्रमगाथा’ या सत्राचे सूत्रसंचालन रिअर अॅडमिरल आशिष कुलकर्णी यांनी केले. यानंतर प्रसिद्ध कवी, लेखक, अभिवाचक आणि अभिनेते किशोर कदम उर्फ सौमित्र यांनी ‘कथायात्रा‘ अंतर्गत सायंकालीन सत्रात कथेचे सादरीकरण केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading