Sunday, June 21, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

देशसेवा, कर्तव्य आणि त्याग हीच काँग्रेसची विचारधारा – सचिन सावंत

पुणे : “गांधी-नेहरू परिवाराने देशासाठी केलेला त्याग, समर्पित व कर्तव्य भावनेने केलेली देशसेवा भारताच्या लोकशाहीचा आदर्श आहे. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता देशसेवा, कर्तव्य आणि त्यागाच्या भावनेने काम करतो. हीच काँग्रेसची विचारधारा असून, भारतीय लोकशाहीला सक्षम करणारी आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले.

अखिल भारतीय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित १९ व्या सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. सप्ताहाचे मुख्य संयोजक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी अध्यक्षस्थानी होते.नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या सोहळ्यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार, पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, काँग्रेसचे दत्ता बहिरट, महिला शहराध्यक्ष पूजा आनंद, माजी महापौर दीप्ती चवधरी, रजनी त्रिभुवन, चंद्रशेखर कपोते, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, रफीक शेख, सुनील मलके, प्रशांत सुरसे, रोहन सुरवसे, चेतन अगरवाल, सुरेश कांबळे, आयूब पठाण आदी उपस्थित होते.

सचिन सावंत म्हणाले, “सोनिया गांधी यांचे व्यक्तिमत्व सेवा, कर्तव्य आणि त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. डोळ्यादेखत सासूला मरताना आणि पतीला अखेरचे नीट पाहता आले नसतानाही सोनियाजी ज्या धीरोदात्तपणे उभ्या राहिल्या; टीका, अवहेलना सहन करत गांधी घराण्याचा देशसेवेचा व कर्तव्याचा वारसा पुढे चालवला, तो आपल्या सर्वांसाठी प्रेरणा देणारा आहे. अनेक नेत्यांनी विनवणी केल्यानंतर आणि पंतप्रधान पदाची संधी सहजपणे असतानाही त्यांनी ती नाकारत उदारपणे डॉ. मनमोहन सिंग यांना दिली. हा त्यांचा त्याग गांधी-नेहरू घराण्याच्या उदात्त भावनेचे दर्शन घडवतो.”
सुषमा अंधारे म्हणाले, “सध्याचे सत्ताधारी कर्तव्य आणि त्याग विसरून गेले आहेत. देशात संधीसाधूपणा वाढलेला असून, प्रत्येकजण लुबाडण्याचे काम करतोय. अशावेळी सासू, नवर्‍याचा मृत्यू उघड्या डोळ्यांनी पाहूनही सोनिया गांधी यांनी दाखवलेला कणखरपणा आणि सेवा व कर्तव्य त्यागाची भावना देशवासियांसाठी आशादायी आहे. भाजपचे ‘डॅमेज’ अणि ‘रूल’ हे सूत्र असून, भय, भ्रम आणि चारित्र्य हनन ही वृत्ती आहे. या अस्त्राचा उपयोग करून विरोधकांना संपवण्याचे डाव भाजपचे करते. मात्र, आता जनतेचे डोळे उघडत असून, येणाऱ्या काळात भाजपाला जनता त्यांची जागा दाखवून देईल.”
“भवताल भ्रमीत करून, चारित्र्य हत्या केल्या जात आहेत. भाजपचे नेते विकृत वृत्तीचे दर्शन घडवत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील बुरखा फाडून खरा चेहरा उघडा पाडण्याची वेळ आली आहे. महिलांचा आदर करत नाहीत. देवधर्माच्या नावाखाली मूर्ख बनवण्याचा धंदा ही मंडळी करत आहेत. नात्यांमध्येही व्यापार करण्याची यांची वृत्ती आहे. फोडाफोडी, तोडातोडीचे सूत्र महाराष्ट्रासह इतर अनेक ठिकाणी वापरले जात आहे. गाईबद्दल संवेदना दाखवणारे हिंदूवादी लोक बाईबद्दल मात्र संवेदनशील नाहीत, हे दुर्दैवी आहे. पाच राज्यांचा निकाल भारतीय लोकशाही व संविधानाच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. लोकांचे प्रश्न समजणारे लोकप्रतिनिधी आजच्या काळात गरजेचे असून, ते केवळ काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीचेच असू शकतात,” असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

सक्षणा सलगर म्हणाल्या, “पंतप्रधान पदाला नम्रपणे नकार देत सेवाभावाने काम सोनिया गांधी यांनी केले. काँग्रेस हा विचार आहे. या देशाला पुढे घेऊन जायचे असेल, तर काँग्रेस विचारांवर चालायला हवे. देशाला पहिल्या राष्ट्रपती काँग्रेसने दिल्या. बदल गरजेचा असून, नव्या पिढीचा उत्साह, अनुभवी व ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन याची सांगड घातली, तर हा बदल नक्की होईल. राहुल गांधी सक्षम नेते आहेत. त्यांना आपण सगळ्यांनी साथ त्यांचे हात बळकट करायला हवेत. शरद पवार याही वयात ज्या उत्साहाने काम करतात, त्यातून आम्हाला मोठी ऊर्जा मिळत आहे.”

स्वागत प्रास्ताविकात मोहन जोशी म्हणाले, “पंतप्रधान पदाची संधी असतानाही, तसेच देशातील अनेक बड्या नेत्यांनी विनंती करूनही सोनिया गांधी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केले. पदाचा त्याग करत, जनतेच्या सेवेचे कर्तव्य त्यांनी बजावले. त्यांच्या या त्याग, सेवा व कर्तव्य भावनेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या १९ वर्षापासून हा सप्ताह साजरा केला जातो. शहराच्या विविध भागात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.”

उल्हास पवार यांनी समारोपाचे भाषण केले. प्रशांत सुरासे यांनी सूत्रसंचालन केले. प्रथमेश आबनावे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading