मोदींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा -केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आवाहन
पुणे : आत्मनिर्भर, समृद्ध, गरिबीमुक्त देश निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.
केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती व नोंदणी करण्यासाठी 28 नोव्हेंबर ते 26 जानेवारी या कालावधीत ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे देशभर आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी या उपक्रमांतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले.
बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खासदार प्रकाश जावडेकर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शहर भाजपचे प्रभारी माधव भांडारी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, राजेंद्र काकडे यांची उपस्थिती होती.
राणे म्हणाले, मोदी 140 कोटी लोकांचे पंतप्रधान आहेत. आपण राबविलेल्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या का? त्यांना त्याचा किती लाभ झाला? लाभार्थ्यांनी लाभ कसा घेतला? जर लोकांपर्यंत योजना पोहोचल्या नसतील तर काय नियोजन करता येईल? या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी देशभर विकसित भारत संकल्प यात्रेचे मोदींनी आयोजन केले आहे.
जावडेकर म्हणाले, विविध देशांमध्ये कोरोनाच्या लसीकरणासाठी शुल्क आकारले गेले. परंतु मोदींनी भारतीयांना दोन्ही लशी विनामूल्य उपलब्ध करून दिल्या. त्याबरोबर विविध योजनांचा लाभ मिळून दिला. त्यासाठी आपण मोदींच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.
