महात्मा ज्योतिबा फुलेंनी शुद्रांना साहित्यात नायकाचे स्थान दिले – डॉ. रणधिर शिंदे
पुणे : महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रस्थापित साहित्यातील पात्र बदलत साहित्यात बहुजन, श्रमिक, शुद्र, अतिशुद्रांना नायकाचे स्थान दिले. असे करून त्यांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्ष विविध साहित्याच्या रूपात समाजासमोर मांडला, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. रणधिर शिंदे यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रंसगी ते बोलत होते. यावेळी डॉ. रणधिर शिंदे, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, वित्त व लेखा अधिकारी श्रीमती चारूशिला गायके, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ.मनोहर जाधव, महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनिल भंडगे यांनी प्रशासकीय इमारती समोरील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
फुले वाङ्मय म्हणजे वैचारिक आणि सामाजिक सुधारणेचा इनसाइक्लोपीडिया आहे. लेखक, नाटककार, कवी, निबंधकार असलेल्या फुले यांचे साहित्य समाजाचे वास्तव्य मांडणारे आहे. त्यांनी साहित्यात समाजिक परिवर्तन, सामाजित बांधिलकी, स्त्री-पुरूष समानता, समाजातील पिडितांची व्यथा मुख्यत्वाने मांडली आहे. त्यांनी प्रस्थापित साहित्यिक भाषा न वापरता सामान्यांना समजणारी, रांगडी, खेळवड, देशीपण असलेली जनसंवादाची बोलीभाषा वापरली असल्याचेही डॉ. रणधिर शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची लोककल्याणकारी राजा म्हणून ख्याती मिळवून देण्यात फुले यांच्या साहित्याचे मोठे योगदान असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार सध्याच्या काळात खुप महत्त्वाचे असून त्या विचारांचा प्रचार-प्रसार होणे गरजेचे असल्याचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यावेळी म्हणाले. याप्रसंगी रासेयोचे संचालक डॉ. सदानंद भोसले, समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. श्रृती तांबे, शिक्षणशास्त्र व विस्तार विभाग प्रमुख डॉ. गिता शिंदे यांच्यासह शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ.मनोहर जाधव यांनी केले.
