ICC World Cup – न्यूझीलंडचा पराभव करून भारत अंतिम फेरीत दाखल
मुंबई : एकदिवसीय क्रिकेट वनडे वर्ल्डकपच्या पहिला उपांत्य फेरीचा सामना वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाला. या समन्यात भारताने 70 धावांनी न्यूझीलंडचा पराभव करत वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे. या सामन्यात विराट कोहली आणि आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 397 धावांचे आव्हान न्यूझीलंडसमोर ठेवले. विशेष म्हणजे गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांने तब्बल सात विकेट घेत भारताला दमदार विजय मिळवून दिला.
आज कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. वनडे वर्ल्डकपच्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडसमोर यजमान भारताने कडवे आव्हान ठेवले आहे. चार वर्षांनंतर या फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने आले होते. प्रथम फलंदाजी करताना भारताने चार विकेट गमावून 397 धावा केल्या.
भारताकडून विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी शानदार शतकी खेळी खेळली. कोहलीने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 50 वे शतक झळकावले. कोहलीने 113 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 117 धावा केल्या. तर चौथ्या क्रमांकावर आलेल्या श्रेयस अय्यरने 70 चेंडूत 150 च्या स्ट्राईक रेटने 105 धावा केल्या. अय्यरने या खेळीत 4 चौकार आणि 8 शानदार षटकार मारले.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं 50 वे एकदिवसीय शतक झळकावले आणि सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मोडला. . 2009 मध्ये विराट कोहलीने वनडेतील पहिले शतक ठोकले होते.
मोहम्मद शमीने यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत तिसऱ्यांदा पाच विकेट्स पटकावत विजयाचं पारडं भारतीय संघाच्या दिशेने झुकवलं. या सामन्यात मोहम्मद शमीने एकूण सात विकेट घेतल्या.