Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

भाजपची रेल्वेतही नफेखोरी – माजी आमदार मोहन जोशी

पुणे- रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात मिळणारी सवलत भाजपच्या नफेखोर कारभाराने रद्द करण्यात आली आहे. ती सवलत लवकरात लवकर चालू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिला आहे.

रेल्वे खात्याकडून २०२० सालपर्यंत ६० वर्षांवरील ज्येष्ठांना तिकीटावर ४० टक्के सवलत आणि ५८ वर्षे वयाचा पुढील महिलांसाठी ५० टक्के मिळत होती. ही सवलत सर्व रेल्वेगाड्यांसाठी होती. २०२० साली ‘कोरोना’चे निमित्त करून मोदी सरकारने ज्येष्ठांसाठीची ही सवलत बंद केली. आता कोरोना संपून दोन वर्षे झाली, तरीही ही सवलत चालू करण्यात आलेली नाही, हे अन्यायकारक आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

वास्तविक कोरोना साथीच्या काळात सामान्य माणसाचे आर्थिक गणित कोलमडलेले होते. अशावेळेस रेल्वेकडून सवलतीची गरज होती. पण, मोदी सरकारने बेदरकारपणे सवलत रद्द केली. सरकारने सांगितलेली ‘कोरोना’ची सबब तकलादू आहे. भाजपचे नफेखोरीचे धोरण यातून दिसते. या नफेखोरी वृत्तीतून गेल्या दहा वर्षांत मनमानी पद्धतीने भाडेवाढ करण्यात आलेली आहे. सरकारच्या अशा धोरणामुळे सामान्य माणसाची लुबाडणूक होत आहे, प्रवास महाग केलेला आहे. रेल्वेचे अपघात कमी होण्यासाठी मुलभूत उपाययोजना न करता सुधारणांच्या नावाखाली स्टंटबाजीच करण्यात येत आहे. हे निषेधार्ह आहे. सर्वसामान्य माणसाला परवडणारी वाहतूक सेवा, ही रेल्वेची ओळख आहे. ती ओळख कायम ठेवून ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात पूर्ववत सवलत मिळावी. अन्यथा सवलत मिळावी, या मागणीसाठी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल, असा इशारा मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading