भौतिक प्रगती बरोबर मानसिक प्रगतीची गरज माजी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांचे मत
वल्लरी प्रकाशन संस्थेच्या वतीने मधुमालती या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार, प्राध्यापिका कीर्ती मुळीक, रामदास स्वामी अभ्यासक शरद कुबेर, ज्येष्ठ कवी म.भा. चव्हाण, मानसी चिटणीस, चैतन्य ज्ञानपीठाचे मुकुंद गोरे, संपादक व्यंकटेश कल्याणकर, किरण इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वल्लरी मीडियाच्या वतीने चैतन्य ज्ञानपीठचे संस्थापक मुकुंदराव गोरे यांना पहिला जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, उपरणे, शाल, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
उमाकांत दांगट म्हणाले, मनाची प्रगती करण्यासाठी रामदास स्वामी यांनी सांगितलेले मनाचे श्लोक अभ्यासले पाहिजेत. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, असे साने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने माणुसकीने वागण्याची गरज आहे. मनाची प्रगती झाली की अनेक समस्या सुटतील, असे ही त्यांनी सांगितले.
व्यंकटेश कल्याणकर म्हणाले, आज मनावर संस्कार करणाऱ्या साहित्याची गरज आहे. आपल्या संतांनी मनावर संस्कार करणारे अनेक साहित्य लिहिले. त्यातील एक उत्तम उदाहरण म्हणजे रामदास स्वामी यांनी लिहिलेले मनाचे श्लोक हे आहे. मनावर संस्कार झाले की समाज आणखी प्रगत होईल.
