क्षण क्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकारने त्वरित थांबवावा – रोहित पवार
– शिक्षण क्षेत्र वाचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव समितीचा विराट मोर्चा
पुणे – महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव समिती पुणे जिल्हा यांच्या वतीने शनिवार वाडा ते जिल्हा अधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला होता. हजारोंच्या संख्येने शिक्षक, मुख्याध्यापक तसेच पुणे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील जवळपास ३० ते ३२ संघटनांचे पदाधिकारी या प्रसंगी हातात निषेधाचे फलक, बॅनर घेवून सहभागी झाले होते. शिक्षण आमच्या हक्काचं, कोण म्हणंत देत नाय.. अशा अनेक घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. या मोर्चामध्ये आमदार रोहित पवार, आमदार रवींद्र धंगेकर, डॉ. भालचंद्र मुणगेकर, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, मा. आमदार गव्हाणे, मोहन जोशी, मा. स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम, समन्वयक शिवाजी खांडेकर , शिक्षण हक्क सभेचे प्रा. शरद जावडेकर, मा. जि. प. अध्यक्ष विजय कोलते, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार सागर, संस्थाचालक संघटनेचे पुणे विभागाचे अध्यक्ष अप्पासाहेब बालवडकर, शिक्षक लोकशाही आघाडीचे शिवाजीराव कामथे, कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे संतोष फासगे, क्रीडा शिक्षक संघटनेचे शरदचंद्र धारूरकर, शिक्षक सेनेचे सुनील जगताप, प्राथमिक शिक्षक संघटनेचे विकास थिटे, नारायण शिंदे, शिक्षकेतर संघटनेचे विनोद गोरे ,प्रसन्न कोतुळकर असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
रोहित पवार म्हणाले की महाराष्ट्र शासनाने शिक्षण क्षेत्रात बदल करणारे वेगवेगळे शासन आदेश काढून शिक्षण क्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने समूह शाळा योजना, शाळा दत्तक योजना, शाळांचे खाजगीकरण, सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. याला विरोध करण्यासाठी व शिक्षण क्षेत्र वाचविण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता.
शिवाजी खांडेकर म्हणाले की महाराष्ट्र शासनाद्वारे काढण्यात आलेल्या शाळा दत्तक योजना, सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण व समूह शाळा योजनेच्या नावाखाली शाळा बंद करण्याचे धोरणाला विरोध करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटनांच्या वतीने आम्ही मोर्चा काढला होता. सरकारने त्वरित शिक्षण क्षेत्रातील कंत्राटीकरण थांबवावे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव समन्वय समितीचे समन्वयक शिवाजी खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यावतीने तहसीलदार धनंजय जाधव यांना निवेदन देवून मोर्चाची सांगता करण्यात आली.
