Monday, August 31, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

मराठवाड्याच्या समस्या सोडविण्यासाठी आवाज बुलंद करण्याची गरज


उदयोन्मुख तरुणाईने सन्मानसोहळ्यात व्यक्त केली अपेक्षा : केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते गौरव
पुणे : मराठवाड्याचा भौगोलिक नकाशा संघर्षच दर्शवितो. संघर्षपूर्ण जीवनातून मराठवाड्यातील प्रत्येक व्यक्तीने विविध क्षेत्रात भरारी घेतली आहे. मराठवाडा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असला तरी मराठवाड्याचा संघर्ष अद्याप संपलेला नाही. मराठवाड्याच्या ज्या-ज्या समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी प्रत्येकाने आवाज बुलंद केला पाहिजे, अशी अपेक्षा मराठवाड्यातील तरुणाईने व्यक्त केली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सव समारोह समिती आणि वृंदावन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष सांगता समारंभानिमित्त सोमवारी (दि. 9) ‌‘उद्याच्या मराठवाड्याचे शिल्पकार’ हा मराठवाड्यातील उदयोन्मुख तरुणाईशी सुसंवाद आणि सन्मानसोहळा आयोजित करण्यात आला होता. गणेश सभागृहात आयोजित कार्यक्रमात यशस्वी तरुणाईचा सन्मान केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांच्या हस्ते करण्यात आला. मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सव समारोह समितीचे अध्यक्ष, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, संयोजक सचिन पाटील, विश्व हिंदू परिषदेच्या देवगिरी प्रांताचे सहमंत्री गणेश मोकाशी, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज हभप माणिकबुवा महाराज मोरे, देहू संस्थानचे अध्यक्ष हभप प्रा. पुरुषोत्तम महाराज मोरे, हभप भानुदास महाराज मोरे, रिअर ॲडमिरल (निवृत्त) पुरुषोत्तमदत्त शर्मा व्यासपीठावर होते.

मराठवाड्यातील अनेक तरुणांनी आपल्या कार्यातून मराठवाड्याच्या नावलौकिकात भर घातली आहे. त्यातील उमाकांत मीटकर, विलास बडे, संदीप पाठक, नवनाथ बन, रामेश्वर सब्बनवाड, डॉ. आकाश राठोड, दीपक चांदणे, मीरा वाडकर, अनिता दटुबोने, प्रशांत नवगिरे, भीमराव वायवळ, श्रमिक गोजमगुंडे, बाजीराव चव्हाण, विजय शेंबडे, प्रविण कस्पटे, ओंकार कुलकर्णी, सुनील सानप, विलास पाटील, अमर वाघमारे, ॲड. अनिरुद्ध जाधव तसेच अंतरा संतोष जाधव, सानवी सुखदेव बारकुल, विभावरी अविनाश जाधव या शालेय विद्यार्थिनींचाही सत्कार मंत्री रामेश्वर तेली यांच्या हस्ते करण्यात आला. मराठवाडा मुक्तिसंग्रामात योगदान देणाऱ्यांच्या वंशजांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.
मराठवाड्याचा विकास साधायचा असेल तर रोजगार, शेती, पाणी या प्रश्नांवर मात करून पुढे जाणे अपेक्षित आहे. मराठवाडा पाण्याच्या दृष्टीने समृद्ध झाल्यास मराठवाड्याच्या समस्या सुटण्यास मदत होणार आहे. पाण्यासंदर्भात शाश्वत धोरण असणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मराठवाड्यातील तरुण ज्या ज्या क्षेत्रात कार्यरत आहेत त्या त्या ठिकाणी मांडणे अपेक्षित आहे. मराठवाड्यातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय मराठवाड्याच्या समस्या दूर झाल्या असे म्हणता येणार नाही, अशी मते तरुणाईने नोंदविली.
कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका डॉ. सुनील गायकवाड यांनी विशद केली. मान्यवरांचे स्वागत समितीचे कार्यवाह सिद्धेश्वर माने, स्वप्नील देशमुख, सचिन पाटील, शिवाजीराव गिड्डे यांनी केले. सूत्रसंचालन सोमनाथ लांडगे यांनी तर आभार सचिन पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading