‘वंचित’चा अशोक चव्हाण यांना सवाल; वंचितची इन्ट्री INDIA, महाविकास आघाडीत येण्यापासून कोण रोखतंय ?
मुंबई – वंचित बहुजन आघाडीला देश पातळीवरील INDIA आघाडीत आणि राज्यातील महाविकास आघाडीत समाविष्ट करण्यापासून कोण रोखत आहे? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.सोमनाथ साळुंखे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना केला आहे.
काल माध्यमांशी बोलत असताना मा. अशोक चव्हाण म्हणाले की, माझी वैयक्तिक इच्छा आहे की, वंचित बहुजन आघाडीचा समावेश INDIA आघाडीत व्हावा. त्याचा फायदा INDIA आघाडीलाच होईल. ‘वंचित’ला समावेश करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल.
याला वंचित बहुजन आघाडीचे नेते सोमनाथ साळुंखे यांनी प्रतिउत्तर देतांना असं म्हटले की, मा.अशोक चव्हाण, वंचित बहुजन आघाडी INDIA युती आणि मविआमध्ये महत्त्वाचा आणि व्यवहार्य घटक होऊ शकतो. आकडेवारी खोटं बोलत नाही. आम्ही वारंवार वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे INDIA, महाविकास आघाडीसाठी खुले आहेत हे सांगत आहोत.
INDIA युती आणि मविआला येणाऱ्या लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपला खरंच प्रामाणिकपणे पराभूत करायचे असेल, तर काँग्रेसला बाळासाहेब आंबेडकरांना INDIA, महाविकास आघाडीमध्ये सहभागी करून घेण्यापासून कोण थांबवत आहे? वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे भाजपविरोधी सर्व पक्ष आणि जन संघटनांसाठी कायमच खुले आहेत.
महाराष्ट्रामध्ये निर्णायक ताकद असतांना वंचित बहुजनांच्या अस्तित्वाला नाकारून आरएसएस – भाजपच्या विषमतावादी ताकदीशी INDIA, महाविकास आघाडी लढणार कशी? हा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित राहतोय.
भाजपविरोधी संघर्षासाठी सक्षम विरोधी पक्ष वंचित आणि बहुजनांच्या सहभागाशिवाय अपुरा आहे. भाजप – आरएसएसशी लढण्यासाठी वंचितांची ताकद आवश्यक आहे. असे जोरदार प्रतिउत्तर प्रा.साळुंखे यांनी दिले आहे.
देशभरातील अनेक राज्यात दलित, आदिवासी, ओबीसी मतांवर ‘वंचित’चे नेते प्रकाश आंबेडकर यांची पकड असतांना त्यांना INDIA आघाडीत त्यांचा समावेश का केला जात नसेल? अशी शंका यानिमित्ताने उपस्थित राहतेय.
