मोदी संसदेत येऊन मणिपूर बद्दल भूमिका मांडणार कधी खासदार गौरव गोगोई यांचा सवाल
नवी दिल्ली : लोकसभेत 26 जुलैला विरोधकांकडून खासदार गौरव गोगोई यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून स्वीकारून आज आणि उद्या चर्चा करण्यासाठी मान्यता दिली. या प्रस्तावाच्या सुरुवातीला खासदार गौरव गोगोई यांनी अविश्वास प्रस्ताव मांडण्यास सुरुवात केली. यावेळी बोलताना गौरव गोगोई म्हणाले की, हे आमचे दुर्दैव आहे की हा प्रस्ताव आणवा लागला. आज मणिपूरमधील लोकांकडून न्याय मागण्यात येत आहे. तेथील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवा न्यायाची मागणी करत आहेत. ज्या घटना मणिपूरमध्ये घडत आहेत, तर असे वाटत असेल की, या घटना पूर्वोत्र भागात घडत आहेत, असे वाटत असेल तर असे नाही आहे. कारण ज्यावेळी मणिपूर जळते तेव्हा भारत जळतो. मणिपूरमध्ये आग लागली आहे तर भारतात आग लागली आहे. त्यामुळे आज आम्ही मणिपूर नाही, भारताचा मुद्दा उपस्थित करत आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल 80 दिवसांनी माध्यमांशी बोलताना फक्त 30 सेकंद भूमिका मांडली. त्यामुळे आमची स्पष्ट मागणी आहे की, त्यांनी देशाचे प्रमुख या नात्याने लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात यावे आणि आणि भूमिका मांडावी. त्याला सर्व पक्षांनी समर्थन द्यावे आणि मणिपूरला संदेश जावा की हे सगळं सभागृह या कठीण प्रसंगी मणिपूरसोबत आहे. पण दुर्दैवाने असे झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन व्रत धारण केले. ना लोकसभेत बोलणार, ना राज्यसभेत बोलणार. त्यामुळेच अविश्वास ठराव आणण्याची वेळ आली. असेही गोगोई म्हणाले.
यावेळी खासदार गौरव गोगोई यांनी मणिपूरच्या हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन प्रश्न विचारले. यावेळी पहिला प्रश्न विचारताना ते म्हणाले की, आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरला का गेले नाही? आमच्या विरोधकांमधील पक्षातील वेगवेगळे सदस्य गेले. गृहमंत्री अमित शहा गेले, पण मग देशाचे प्रमुख या नात्याने मोदी का गेले नाही. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींना मणिपूरवर बोलण्यासाठी जवळपास 80 दिवस का लागले? जेव्हा ते बोलले, तेव्हाही फक्त 30 सेकंद बोलले. त्यानंतर आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मणिपूरसाठी ना संवेदनशील भावना व्यक्त झाल्या, ना त्यांनी शांतीचे आवाहन केले. मंत्रिमंडळातील सदस्य बोलत आहेत की, आम्ही बोलणार. तुम्ही बोला. तुम्हाला कुणीही अडवलेले नाही. पण एक पंतप्रधान या नात्याने त्यांच्या शब्दाला जे महत्त्व आहे, ते इतर कुणाच्याही शब्दांना नाही. पंतप्रधान या नात्याने मोदींनी शांतीसाठी पाऊले उचलली असती, तर त्यात जी ताकद आहे ती इतर कोणत्या खासदारामध्ये नाही, असा दुसरा प्रश्न गोगोई यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. तर तिसरा प्रश्न विचारत ते म्हणाले की, पंतप्रधानांनी आजपर्यंत मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना पदावरून का नाही काढले? तुम्हाला गुजरातमध्ये तुमचे राजकारण करायचे होते तेव्हा तिथे एकदा नाही, दोनदा मुख्यमंत्री बदलले. उत्तराखंडमध्ये निवडणुका आल्या तेव्हा एकदा नव्हे चार वेळा मुख्यमंत्री बदलले. त्रिपुरातही निवडणुकांआधी तुम्ही मुख्यमंत्री बदलले. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही का एवढे आशीर्वाद देत आहात ज्यांनी स्वत: हे मान्य केले आहे की त्यांच्यामुळे इंटेलिजन्स फेल्युअर झाले आहे.
यानंतर गोगोई यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना स्वतःच उत्तर दिले. तर यावेळी त्यांनी मणिपूरच्या मुख्यमंत्री कार्यालयावर सुद्धा गंभीर स्वरूपाचे आरोप केले. ड्रग्ससाठी मणिपूरमध्ये हा हिंसाचार झाल्याचे तिथल्या मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात येते. पण जेव्हा या प्रकरणात एकाला अटक करण्यात आले तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयातून फोन जावून त्या व्यक्तीला सोडून देण्यात आले. तसेच ड्रग प्रकरणात ज्या व्यक्तीला अटक करण्यात आले तो मणिपूरमधील मंत्र्याचा भाऊ होता, असा थेट आरोप गौरव गोगोई यांच्याकडून करण्यात आला.
