‘रानकवी’ काळाच्या पडद्याआड : ज्येष्ठ कवी ना.धो.महानोर यांचे निधन
पुणे: ‘रानकवी’ अशी ओळख असलेले ज्येष्ठ कवी, गीतकार ना.धो.महानोर (N. D. Mahanor) यांचे आज सकाळी निधन झाले. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic) मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. पळसखेड या त्यांच्या मूळगावी उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मागील काही दिवसांपासून ते व्हेंटीलेटरवर होते. त्यांच्या निधनाने सहित्यविश्वावर शोकाकला पसरली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावात १६ सप्टेंबर १९४२ ना.धो. महानोर यांचा जन्म झाला. १९७८ साली महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार म्हणून देखील ना.धो. महानोर यांनी काम पाहिलं आहे. त्यांना साहित्यातील बहुमूल्य योगदानांसाठी ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर त्यांच्या ‘पानझड’ या काव्यासंग्रहाला ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार मिळाला आहे. तसेच शेती क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ‘कृषीरत्न; पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
यांनी आपल्या साहित्यात अनेकदा बोलीभाषांचा वापर केला आहे. त्यांच्या कवितांमधून जसे निसर्गाचे दर्शन घडायचे तश्या त्यांनी ठससेबाज लावण्याही लिहिल्या. मी रात टाकली मी कात टाकली, आम्ही ठाकर ठाकर, चिंब पावसानं रान झालं आबादानी, नभ उतरू आलं, जांबुळ पिकल्या झाडाखाली, जाई जुईचा गंध, किती जीवाला राखायचं, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती अशी एकाहून एक सर गाणी ना.धों. महानोर यांनी लिहिली. ‘श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना’ ही लावणी आजही रसिकांच्या मनावर कोराळी गेलेली आहे. केवळ निसर्गकविता न लिहिता, आपल्या काव्यलेखनाला त्यांनी प्रत्यक्ष कृतीची जोड दिली. त्यातून आपल्या गावी पळसखेड्याला शेतीचे विविध प्रयोगही केले. त्यामुळेच सरकार कुठलंही असो, त्यांचं लक्ष कृषिधोरणाकडे असायचं.
