Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

जेजुरी देवस्थान विश्वस्तांच्या धमार्दाय आयुक्तांनी केलेल्या नेमणुका घटनेनुसार 

नवनियुक्त विश्वस्त मंडळ ; राजकीय पक्षाशी निगडीत विश्वस्त निवड असल्याचे आरोप चुकीचे
पुणे :  श्री मार्तंड देवस्थान जेजुरी च्या विश्वस्त निवडीवरून सध्या वाद सुरु असून या पार्श्वभूमीवर, धमार्दाय आयुक्त पुणे विभाग यांच्या वतीने करण्यात आलेल्या सात विश्वस्तांची निवड घटनेनुसार करण्यात आली आहे. तसेच नवनियुक्त विश्वस्त राजकीय पक्षाशी निगडीत असल्याचा आरोप चुकीचा असून या निवडीमध्ये सर्वसमावेशक व उच्चविद्याविभूषित लोकांना पसंती देण्यात आली आहे. ज्यामध्ये डॉक्टर, वकील, व्यावसायिक, बँक अधिकारी अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे, अशी माहिती  श्री मार्तंड देवस्थान जेजुरी च्या नवनियुक्त  सात विश्वस्तांनी पत्रकार परिषदेत दिली.
विश्वस्तांपैकी अध्यक्ष पोपटराव खोमणे, मंगेश घोणे व डॉ. राजेंद्र खेडेकर हे मूळ जेजुरी गावचे रहिवासी आहेत. अ‍ॅड. विश्वास पानसे व अभिजीत देवकाते हे जेजुरी पंचक्रोशीतील निवासी आहेत. अ‍ॅड. पांडुरंग थोरवे हे पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व अनिल सौंदडे हे उद्योगपती व उत्तम व्यवस्थापन करणारे व्यक्तिमत्त्व आहे. कोणत्याही विश्वस्ताला न्यायालयाने आज पर्यंत दोषी ठरवून शिक्षा सुनावलेली नाही. तसेच, सदर नियुक्तीच्या वेळी कोणत्याही शिफारस पत्राचा वापर करण्यात आलेला नाही. किंबहुना माननीय सह धर्मादाय आयुक्त यांनी कोणाचाही दबावाला बळी पडून किंवा शिफारस पत्राच्या आधारे सदर नियुक्त्या केल्या नाहीत, हे निकालातून  स्पष्ट आहे. आंदोलनातील काही व्यक्ती खोटी माहिती पसरवत आहेत.

त्याचप्रमाणे श्री मार्तंड देवस्थान जेजुरी या ठिकाणी विश्वस्त हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच हिंदू धर्मातील, त्याचप्रमाणे पुरुष किंवा स्त्री असावा एवढेच स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी स्थानिकत्वाचा कोणताही मुद्दा नाही. सन २०१२ च्या घटना दुरुस्ती मध्ये पुणे किंवा सासवड बार असोसिएशन चा एखादा पदाधिकारी विश्वस्त म्हणून असावा, असे स्पष्ट नमूद आहे.

त्यामुळे यानुसार धर्मादाय आयुक्त यांनी सर्व विश्वस्त नेमलेले आहेत. देवस्थान साठी तब्बल  ४७९ जणांनी अर्ज केले होते, त्यातील ९५ अर्ज बाद झाले आणि जवळपास ३०० पेक्षा जास्त जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. विश्वस्तांना त्यांच्या मुलाखतीमध्ये विविध क्षेत्रातील प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये सामाजिक विषयांसोबतच मंदिर व्यवस्थापन, दैनंदिन दिनचर्या, पूजा-अर्चा, श्री खंडोबा दैवत याविषयी माहिती, आपत्कालीन व्यवस्थापन आणि अनेक प्रश्न विचारले. त्याला सगळ्या विश्वस्तांनी सक्षमपणे उत्तरे दिली. विश्वस्त राजकीय पक्षाशी निगडित असावा किंवा नसावा, या संदर्भात घटनेमध्ये अशी कोणतीही तरतूद अथवा माहिती उपलब्ध नाही.

*आंदोलनामुळे जेजुरीविषयी समाजात चुकीचा संदेश
श्रीक्षेत्र खंडोबा मार्तंड देवस्थान हे अवघ्या महाराष्ट्रात नव्हे तर जगभरातील भाविकांचे दैवत असल्यामुळे  या ठिकाणी भाविकांसाठी चांगल्या सुविधा तयार करून उत्तम व्यवस्थापन निर्माण होण्यासाठी या नवीन विश्वस्तांच्या नियुक्त्या पूर्णपणे मेरिटवर व कोणत्याही दबावाला बळी न पडता झालेल्या आहेत. या नियुक्तीमुळे सेवेकरी, खांदेकरी, पुजारी, गुरव इत्यादी कोणाच्याही दैनंदिन कामकाजात बाधा येत नाही. मंदिराचे व्यवस्थापन, भाविकांच्या पायाभूत सोयी सुविधा यासंदर्भात नवे विश्वस्त मंडळ कटीबद्ध आहे.

सध्या सुरु असलेल्या आंदोलनामुळे श्री मार्तंड देवस्थान जेजुरी या क्षेत्राबद्दल विनाकारण चुकीचा संदेश समाजात पसरत आहे. इतकेच नव्हे तर भक्तनिवास च्या प्रवेशदाराशीच आंदोलन सुरू असल्यामुळे भक्तनिवास येथे येणा-या भाविकांच्या किंवा कर्मचारी वर्गामध्येही दहशतीचे घबराटीचे वातावरण आहे. मंदिरावर अनेक चांगल्या भाविकांसाठी सोयी सुविधा करण्याचा मानस नवीन विश्वस्तांचा आहे, ज्यामध्ये सुसज्ज हॉस्पिटल, नवीन अध्यायावत भक्त निवास, वृक्षारोपण, दर्शन सभा मंडप, प्रशस्त अन्नछत्र आधी अनेक गोष्टींचा समावेश आहे. मल्हार गडाच्या सर्वांगिण विकासासाठी नवीन विश्वस्त मंडळ कटिबद्ध आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading