Tuesday, September 1, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

नवीन संसद इमारत ही राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून उभे राहिलेले मंदिर -विनायक देशपांडे यांची भावना

 

पुणे : नवी दिल्लीत उभी राहिलेली नवीन संसद इमारत ही स्वतंत्र भारताने स्व:तासाठी उभारलेली पहिली संसद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून आणि हजारो मजुरांच्या राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून लोकशाहीचे हे नवे मंदिर उभे राहिले. ही अप्रतिम देखणी वास्तू भावी पिढ्यांना मोठ्या प्रमाणात प्रेरणा व आत्मविश्वास देईल, असे मत नव्या संसद भवन प्रकल्पाचे मुख्य सल्लागार विनायक देशपांडे यांनी रविवारी व्यक्त केले.

स्मार्ट पुणे फाउंडेशनतर्फे पुण्यातील कोथरूडचे सुपुत्र असलेल्या देशपांडे यांच्या स्वागत व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही देशपांडे यांचा सत्कार केला. स्मार्ट पुणे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला यांनी प्रास्तविक केले. उत्तरार्धात प्रसिद्ध वास्तुविशारद केतन सुधीर गाडगीळ यांनी देशपांडे यांच्याशी संवाद साधला. नव्या संसद भवनाच्या निर्मितीची कथा जाणून घेतली.

नवी संसद ही केंद्र सरकारने हाती घेतलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील मेरूमणी आहे. टाटा प्रोजेक्ट्सकडे हे काम आल्यानंतर आम्ही राष्ट्रीय कर्तव्य म्हणूनच याकडे पाहिले. भूमीपूजनावेळी पंतप्रधान मोदींच्या मनातील राष्ट्रप्रेमाच्या भावनेची सर्वांना जाणीव झाली. तीच भावना सर्वांच्या मनात उतरली. त्यामुळे देशाच्या विविध भागातून आलेल्या मजुरांपासून ते प्रकल्पात विविध टप्प्यांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच राष्ट्रीय कर्तव्य म्हणून काम केले. त्यामुळेच करोना व लॉकडाउनसारख्या आव्हानात्मक काळातही २८ महिन्यांच्या विक्रमी वेळेत हे काम पूर्ण झाले, असे देशपांडे म्हणाले. या काळातील आव्हाने, रात्रंदिवस केलेले काम, कामाचे व्यवस्थापन याचे बारकावेही देशपांडे यांनी उलगडले.
या नव्या इमारतीत भारतीय संस्कृती, भारतीय स्थापत्यकला आणि अत्याधुनिक स्थापत्यशास्त्राचा अनोखा मिलाफ आहे. विमल पटेल यांनी त्याचे आरेखन केले. तर सांस्कृतिक मंत्रालयाने कुठे काय असावे, याचे नियोजन केले. यासाठीच्या विविध वस्तू देशाच्या कानाकोपऱ्यातून आणण्यात आल्या. याशिवाय विविध राज्यातील कलाकारांनी त्याची कलाकुसर केली. त्यामुळे या वास्तूला राष्ट्रीय एकात्मकेचे प्रतीक म्हणता येईल. ही इमारत पर्यावरण पूरक, शाश्वत, भूकंपरोधी असून भविष्याचा विचार करून यात अधिक आसनक्षमता ठेवण्यात आली आहे. लोकसभेची रचना राष्ट्रीय पक्षी मोराप्रमाणे, राज्यसभेची रचना राष्ट्रीय फूल कमळाप्रमाणे आहे. बांधकाम सुरू असताना तीन वेळा पंतप्रधानांनी अचानक प्रकल्पस्थळी येऊन कामगारांशी आपुलकीने संवाद साधला. त्यांना काही अडचण नाही ना, त्यांना या प्रकल्पाविषयी काय वाटते हे जाणून घेतले. त्यामुळे त्यांना नवी ऊर्जा मिळाली. टाटा समूहाने दिलेला संपूर्ण पाठिंबा व देशभावनेतून कामाकडे पाहण्याची शिकवण महत्त्वाची ठरली. या राष्ट्रीय प्रकल्पाची जबाबदारी मला मिळाली, हे मी माझे परमभाग्यच समजतो, असे देशपांडे म्हणाले.

स्वतंत्र भारतासाठी नवी संसद उभारण्याची अनेकदा चर्चा झाली. पण फक्त नरेंद्र मोदीच आपल्या संकल्पनेतून ती साकार करू शकले. पुणेकर देशपांडे यांच्या नेतृत्वात आकाराला आलेली ही भव्यदिव्य इमारत अतिशय सुबक, देखणी आणि थक्क करणारी आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नवी दिल्ली ही जगातील सर्वात आकर्षक सुबक राजधानी ठरेल असे खासदार प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. अजित वाराणशीवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading