व्यावसायिक संधीसाठी भारतात आजचा काळ हा सुवर्णकाळ
पुणे : मराठी माणसांची व्यावसायिकता काही टप्प्यांवर अडकली आहे. यश मिळवायचे असेल तर संघटित होणे गरजेचे आहे. एका नेतृत्वाने दुसरे नेतृत्व तयार करायला पाहिजे. एकत्र येणे आव्हानात्मक असले तरी एकजूट हाच यशाचा कानमंत्र आहे. भारताचा आताचा काळ सुवर्णकाळ आहे, यामध्ये व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. नोकरी व्यवसायासाठी बाहेरच्या देशांमध्ये जाण्याची गरज देखील पडणार नाही. त्यामुळे उद्योग व्यवसायासाठी तरुणांनी पुढे यावे, असा सूर मराठी उद्योजकांच्या ‘व्यवसायाची वज्रमूठ’ या चर्चासत्रात उमटला
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट कोथरूड चॅप्टर यांच्या वतीने शास्त्री रस्त्यावरील संकल्प बँक्वेट येथे ‘व्यवसायाची वज्रमूठ’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे उपसरचिटणीस सुहास फडणीस, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे पुणे रिजन हेड गणेश चव्हाण, चॅप्टरचे अध्यक्ष अजय पाटणकर, सचिव मकरंद आंबेटकर, खजिनदार आनंद कुलकर्णी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
ऑर्बिटल इलेक्ट्रोमेकचे प्रवीण बीचे, निखिल तांबे, मंजिरी बीचे, सागर बावधनकर यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. कमी कालावधीत २०० कोटींचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.
प्रवीण बीचे म्हणाले, ऐकण्याची सवय नसल्याने मराठी माणसाची प्रगती होत नाही. अनेकदा अहंकार ही मुख्य अडचण ठरते. अहंकार कमी झाला तर प्रगती देखील होईल. एकमेकांसोबत पुढे जाऊ, एकटा माणूस पुढे जाऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
निखिल तांबे म्हणाले, नोकरी असो किंवा स्वतःचा व्यवसाय कामाचा आनंद घेता आला पाहिजे. कामाचा आनंद घेतला तर यश आणि पैसा आपोआप मिळेल. सगळ्यांनी श्रीमंत होणे गरजेचे आहे, फक्त मी श्रीमंत होईल ही भावना नको.
