Wednesday, May 27, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मीडियावर छापे टाकणं कोणत्या लोकशाहीत बसतं, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

मुंबईः मीडियावर छापे टाकणं हे कोणत्या लोकशाहीत बसतं. म्हणजेच काय आम्ही वाटेल ते करून पण तुम्ही आवाज नाही उठवायचा. जर आवाज उठवाल तर चिरडून टाकू, ही जी पाशवी वृत्ती आपल्या देशात फोफावायला बघतेय, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

ठाकरेंच्या उपस्थितीत काँग्रेसचे रियाज बुभेरेंसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना भवन येथे शिवसेनेत प्रवेश केला, त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांचं शिवसेनेत मी स्वागत करतो. गेले चार, पाच, सहा महिने मातोश्री नाही तर शिवसेना भवनमध्ये लोकांची रिघ लागलेलीच आहे. जे माझ्यासोबत या परिस्थितीत राहिलेले आहे, ते येतच आहेत. महाराष्ट्रात जे काही चाललेलं आहे ते आम्हाला पसंत नाही आणि हे जर सुरू राहिलं तर या देशात हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावलाय.

मी तुमच्याशी बोलत असताना आता चॅनेल आणि माध्यमं इथे आहेत. खरं म्हटलं तर आपण लोकशाहीचे जे काही चार स्तंभ म्हणतो, न्याय व्यवस्था, प्रशासन, त्याच्यात आणखी एक स्तंभ असतो तो म्हणजे माध्यम, मी तुमच्याशी बोलत असताना तिकडे बीबीसीच्या कार्यालयावर धाड पडलेली आहे आणि धाड टाकलेली आहे. हीसुद्धा बातमी सुरू असेल कारण मी टीव्ही आता बघितलेला नाही. एखाद्या प्रसारमाध्यमाच्या कार्यालयावरती धाड टाकणं हे कोणत्या लोकशाहीत बसतं. म्हणजेच काय आम्ही वाटेल ते करू पण तुम्ही आवाज उठवायचा नाही. जर आवाज उठवाल तर चिरडून टाकू, ही जी पाशवी वृत्ती आपल्या देशात फोफावायला बघतेय. ती आपण वेळेत एकत्र आलो नाही आणि आपली ताकद वाढवली नाही, तर उद्या संपूर्ण देश खाऊन टाकेल, असंही उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलंय. त्या वेळेची लढाई ही स्वातंत्र्याची होती. आता स्वातंत्र्य टिकवण्याची ही लढाई आहे. गुलामगिरी ही गुलामगिरीच असते मग ती स्वकीयांची असो किंवा परकीयांची असेल, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावलाय.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading