संविधानाचे रक्षण केले तर संविधान आपले रक्षण करील : ॲड. सदानंद फडके
पुणे : “धर्मो रक्षति रक्षितः” असे म्हणण्याची आपल्याकडे परंपरा आहे. याचा अर्थ तुम्ही धर्माचे रक्षण करा म्हणजे धर्म तुमचे रक्षण करील, असा होतो. या वाक्यातील धर्म शब्द काढून संविधान टाकला की “संविधानाचे रक्षण करा म्हणजे संविधान तुमचं रक्षण करील,” असा अर्थ होतो. त्यामुळे संविधानाचे रक्षण हे सर्वांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन अॅड. सदानंद फडके यांनी केले.
स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने सिंहगड रस्ता भागातील सनसिटी भागात आयोजित स्वा. सावरकर स्मृती व्याख्यानमालेत “भारतीय संविधानाची राष्ट्रजीवनातील भूमिका”या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळे ज्येष्ठ मूर्तिशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर काळकर, सचिव रवींद्र शिंगणापुरकर, व्याख्यानमाला प्रमुख राघवेंद्र देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते. या व्याख्यानमालेचे उद्घाटन डॉ. देगलूरकर यांच्या हस्ते झाले आणि ती २९ जानेवारीपर्यंत चालणार आहे.
यावेळी अॅड. फडके म्हणाले, की भारत सरकार कायदा २६ नोव्हेंबर १९३५ रोजी मंत्रिमंडळात परित करण्यात आला आणि १९३७ झाली अमलात आणण्यात आला. यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताचे संविधान लागू झाल्यानंतर भारताचा प्रत्येक नागरिक स्वामी झाला. संविधानाचे रक्षण केले तर संविधान आपले रक्षण करेल. मात्र यासाठी सर्व प्रणाली व्यवस्थित चालायल्या हव्यात. देशात १९७५ आणीबाणी जाहीर करण्यात आली. त्यावेळी मूलभूत अधिकारांची पायमल्ली झाली. त्याचवेळेस देशातील १४ उच्च न्यायालयांनी सांगितले की मूलभूत अधिकार हिरावून घेता येणार नाहीत. न्या. रे, न्या. बेग, न्या. चंद्रचूड आणि न्या. भगवती यांनी मूलभूत अधिकाराच्या विरोधात निर्णय दिला होता. मात्र न्या. एच. आर. खन्ना यांनी त्यांचे विरोधात निर्णय दिला. रा. स्व. संघाचे तत्कालीन सरसंघचालक स्व. बाळासाहेब देवरस यांनीही सांगितले होते, की मूलभूत अधिकारांमध्ये काही तरतुदी करणे गरजेचे आहे.
डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रत्यक्ष भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, की स्वा. सावरकरांनी देशाची अनेक प्रकारे सेवा केली. क्रांतिकारक म्हणून कार्य करतानाच अनेक शब्द मराठीत आणले. ते खऱ्या अर्थाने भारत मातेचे पुत्र होत.
प्रास्ताविक अध्यक्ष सुधीर काळकर यांनी केले.
