Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

… काँग्रेस मुक्त भारत होऊ शकत नाही – शरद पवार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनेक वर्षांनी पुण्याच्या काँग्रेस भवनमध्ये आले होते. काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवारांना काँग्रेस भवनमध्ये बोलावण्यात आलं होतं. यानिमित्त त्यांनी काँग्रेससोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, तसंच भाजपविरुद्ध लढण्याची रणनीतीही सांगितली.

‘मी सगळ्यात आधी 1958 ला काँग्रेस भवनमध्ये आलो होते. आज अनेक वर्षांनी काँग्रेस भवनमध्ये आलोय. त्याकाळी काँग्रेसमध्ये अनेक नेते कार्यरत होते. पुणे म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे पुणे असं समीकरण होतं. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचं केंद्र इथे होतं. महाराष्ट्र प्रदेशचा कारभार या वास्तूमधून चालायचा. इथूनच काँग्रेसच्या नेत्यांनी इंदिरा गांधींच्या माध्यमातून नेहरूंना कनव्हिन्सकेलं आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, त्यामध्ये पुण्यातील काँग्रेस भवनचं योगदान मोठं आहे,’ असा इतिहास शरद पवारांनी सांगितला.

‘काही लोक काँग्रेस मुक्त भारत करायचं म्हणतात, पण काँग्रेस मुक्त भारत होऊ शकत नाही. काँग्रेसची विचारधारा आणि योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. काँग्रेसच्या धोरणांबाबत मतभेद असतील, माझेही काही आहेत, पण काँग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावं लागेल,’ असं स्पष्ट मत पवारांनी मांडलं.

‘आताचे सत्ताधारी सत्तेचा दुरुपयोग करत आहेत, त्यांच्याशी एकजुटीने लढावं लागेल. सध्याचे सत्ताधारी काँग्रेसबाबत विद्वेश पसरवतात, पण यात त्यांना यश येणार नाही. महाराष्ट्रात आम्ही विरोधकांनी एकत्र राहण्याचं ठरवलं आहे,’ असं म्हणत शरद पवारांनी भाजपविरुद्ध लढण्यासाठीची रणनीती सांगितली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading