मी 103 दिवस तुरुंगात राहिलो, 103 आमदार निवडून आणणार; संजय राऊत यांचा निर्धार
मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात १०० दिवस तुरुंगात राहिल्यानंतर संजय राऊत यांना बुधवारी जामीन मंजूर झाला. यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली. यावेळी समर्थकांच्या आणि शिवसैनिकांच्या मोठ्या गर्दीला आपल्या घराजवळ संबोधित करताना संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपला थेट आव्हान दिले आहे. मला १०३ दिवस कारागृहात ठेवले, आता मी १०३ आमदार निवडून आणणार आणि पुढचा मुख्यमंत्री आपल्या शिवसेनेचाच होणार, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.
संजय राऊत म्हणाले की, मी घरी आलो आहे. माझ्या सुटकेने संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला. बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक कसा असतो, हे आज महाराष्ट्राने पाहिले. याच रस्त्यावरून मला अटक करून घेऊन गेले होते. तेव्हाही मी सांगितले होते की, मरण पत्करेन पण शरण जाणार नाही.
मी शिवसेना आहे. मागील तीन-चार महिन्यांत शिवसेना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती तुटलेली नाही. ही बुलंद शिवसेना आहे. अंधेरीच्या निवडणुकीने दाखवून दिले की, शिवसेनेची मशाल पेटली आहे. आता त्यांना कळेल की, मला अटक करून किती मोठी चूक केली. देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी चूक म्हणजे संजय राऊतांना अटक केली, असेही राऊत यांनी म्हटले.
न्यायालयाने सांगितले की, राऊतांचा कोणताही गुन्हा नाही. मला कितीही वेळा अटक करा मी शिवसेनेला त्यागणार नाही. पुन्हा मला अटक होईल. एकवेळ मरण पत्करेन. परंतु शिवसेना सोडणार नाही. मी भगव्याबरोबर जन्माला आलो आणि भगव्याबरोबरच जाईल, असेही राऊत यांनी म्हटले.
