Sunday, June 14, 2026
Latest NewsPUNE

राजकारणातला सिंघम गेला दीपक पायगुडे यांची भावनिक पोस्ट

पुणे:माझे अत्यंत जवळचे मित्र, वडीलबंधू माजी आमदार विनायकशेठ निम्हण यांच्या निधनाची बातमी ऐकून मन अगदी सुन्न झालं; अजूनही यावर विश्वास बसत नाही. त्यांचं असं जाणं सर्वांनाच व्यथित करणारं आहे. शिवसेनेत असताना मी भवानीपेठ विधानसभा मतदारसंघाचा तर विनायकशेठ हे शिवाजीनगर मतदारसंघांचे आमदार होते. शिवसेनेच्या ‘जय भवानी जय शिवाजी…!’ या घोषणेशी जवळीक साधणारे असे हे आमचे मतदारसंघ असल्यानं वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आम्हां दोघांना उद्देशून मतदार संघाच्या नावावरूनच माझा जय भवानी आणि विनायकशेठ यांचा जय शिवाजी… असं संबोधित असत. शिवसेनाप्रमुखांच्या या उल्लेखानं शेठ खूप खुश होत असत. त्यांची एकूण कार्यशैली पाहता, त्यांना राजकारणातले खऱ्या अर्थानं ‘सिंघम’ म्हणता येईल असेच ते होते. कोणत्याही Action ला तात्काळ Reaction हा त्यांचा मुळ स्वभाव होता. त्यांची राजकारणातली एन्ट्री आणि पावलापावलावर त्यांच्यात होत गेलेला सकारात्मक बदल हा पाषाणातून जशी मूर्ती घडवली जाते ना, अगदी तसंच त्यांनी स्वतःची राजकीय कारकिर्द स्वतः घडविली होती. एकदा एखाद्याला शब्द दिला की मग तो शब्द पूर्ण करण्यासाठी मग ते स्वतःचं देखील ऐकायचं नाहीत; त्याचा काहीही परिणाम होवो, मागे फिरणं त्यांना ठाऊकच नव्हतं. एकदोन नाही तर अशी शेकडो उदाहरणं आहेत. हाच विनायकशेठ यांचा प्लस पॉईंट होता. त्यामुळं सध्या सक्रिय राजकारणातून थोडंसं बाजूला असतानाही त्यांचा मोठा मित्रपरिवार सर्व पक्षात आणि संस्थामध्ये होता. त्यांच्याशी ते सतत संपर्कात असायचे. आमदार असताना आमचं मुंबईला एकत्र जाणं असो किंवा नागपूरच्या विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर हल्दीराम मधून मतदार संघातले शिवसैनिक, मित्रपरिवारासाठी संत्राबर्फीची हजारो रुपयांची खरेदी असो. ते मनापासून करायचे. त्यांना दुसऱ्यांना भरवणं खूप आवडायचे. त्यांचं वागणं हे ‘शेठ’सारखं असायचं; म्हणूनच त्यांना सारे ‘शेठ’ असंच संबोधित असत. कारण ते ‘स्वभावाचेही शेठ’ होते. अत्यंत मनमोकळ्या स्वभावाचे शेठ हे आपला मित्र परिवार हाच आपला कुटुंबकबिला आहे असं ते म्हणत! कुटुंबातले सदस्य, नातेवाईक, शिवसैनिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते यात त्यांनी कधीच अंतर राखलं नव्हतं. माझ्या अडचणीच्या काळात विनायकशेठकडून येणारे फोनवरील शब्द हे आधार वाटायचे, त्या अडचणीतून पार पडण्यासाठी सहाय्यभूत ठरायचे. काही महिन्यांपूर्वीच आमच्या एका कॉमन मित्राच्या मुलाच्या लग्नानिमित्तानं गोव्याला गेलो असताना आमच्या भरभरून गप्पा झाल्या. सुखदुःखाचे क्षण आम्ही एकत्रच अनुभवले. अशा माझ्या स्वभावाने शेठ असणाऱ्या मित्राला श्रद्धांजली वाहणं खूप जड जातंय; पण नियती पुढं कुणाचंच काही चालत नाही! दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच त्यांना श्रद्धांजली वाहावी लागतेय हे मोठं क्लेशकारल आहे. माझ्या या ‘सिंघम’ मित्राला, ‘पाषाणा’तल्या ‘विनायक’मूर्तीला माझं विनम्र अभिवादन….!भावपूर्ण श्रद्धांजली….!!!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading