आता पार दुष्काळाचं वाटोळं झालं आहे-विरोधी पक्ष नेते अजित पवार
बारामती:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही त्या गोष्टीला दुजोरा दिला आहे.
काही ठिकाणी मी आणि मुख्यमंत्री एकत्र तर काही ठिकाणी आम्ही स्वतंत्र दौरे काढणार आहोत”, असं देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं
आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.आता पार दुष्काळाचं वाटोळं झालं आहे. ओल्या दुष्काळाबाबत मी स्वत: दिवाळीच्या आधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. तेव्हाच मी म्हणालो होतो की परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. एकतर सगळ्यांची खरीपाची पिकं गेली. रब्बीचीही पिकं गेली. शेतकऱ्याला आता काय करावं आणि काय करू नये हे सुचत नाहीये. तो इतका चिंतेत आहे की विचारता सोय नाही.असं विरोधी पक्ष नेतेअजित पवार पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले आहेत.
अजित पवार म्हणाले,आज सण आहे. आज कुणावर टीका करून सणाच्या उत्साहावर विरजण घालण्याचं काम मला करायचं नाही. आजचा सण संपू द्या. उद्या त्यावर माझी किंवा पक्षाची भूमिका मांडण्याचं काम आम्ही करू.असं अजित पवार म्हणाले.
दिवाळी पाडवा, भाऊबीजेच्या, नूतन वर्षाच्या राज्यातील जनतेला अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
अजित पवार म्हणाले, पाडवा व भाऊबीज एकाच दिवशी हा योग यंदा जुळून आला. गेली दोन वर्षे कोरोनामुळे महत्त्वाचे सण साजरे करता आले नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पाडव्याला जनतेला भेटण्याची वर्षानुवर्षाची परंपरा आहे. या दिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांना ते भेटत असतात. आज सकाळी साडे सात वाजल्यापासून ते लोकांना भेटले आहेत.
माझ्यासह खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार, पार्थ पवार हे ही सोबत होते. एवढा मोठा समाज भेटीसाठी येतो, त्याचे माझ्या कुटुंबातील काही तरुणांनाही कुतुहल होते. त्यामुळे काहीजण येथे थांबले होते. आम्ही चौघे तर लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने आमची जनतेशी नाळ जोडली गेलेली आहे. पाऊस उघडल्याने आजचा सोहळा आनंदात पार पडला. पोलिस यंत्रणेने, आमच्या कार्यकर्त्यांनी काळजी घेतली. अनेकांना आमच्यासोबत फोटो काढायचे होते. परंतु वेळेमुळे त्यावर मर्यादा आल्या. त्यातून कोणी गैरसमज करून घेऊ नये.
