आदित्य यांच्यावर टीका म्हणजे लोकांच्या डोळ्यात धुराळा उडवण्याचा प्रकार -डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे : वेदांता फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात काल पुणे जिल्ह्यातील तळेगावात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आदित्य ठाकरे यात्रा काढून पायावर धोंडा मारून घेतायत .त्यांना माहिती नाही कि आपल्यामुळे किती प्रकल्प बाहेर गेलेत . अशी टीका मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांची बोलताना आदित्य ठाकरे यांच्यावर केली. त्यावर आदित्य ठाकरे मराठी मुलांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आदित्य यांच्यावर टीका म्हणजे हे लोकांच्या डोळ्यात धुराळा उडवण्याचा प्रकार आहे. अशी टीका शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या,देशात 75 टक्के विरोधकांवर ईडीची कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा फक्त एक हाती कार्यक्रम चालू आहे. तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करण्याचा. शिवसेनेवर जनतेचे मोठ प्रेम आहे, नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. पोलिसांकडे जे पुरावे येतील, पोलीस तशी कारवाई करतील. तपासावरून लक्ष उडावं म्हणून पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. मूळ विषयावरून लक्ष हटवण्यासाठी त्यांनी अतिशय चुकीचे कृत्य केले आहे. जे झालं ते सगळं समोर यावं.अशी मागणी त्यांनी केली.
शिवसेनेला शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे. मात्र, शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांना सुप्रीम कोर्टात जायचं असेल तर खुशाल जाऊ द्या. आम्ही आमची बाजू सातत्याने आणि नियमाने मांडू. यात सगळ्यात मोठा साक्षीदार ईश्वर आहे, तो सगळं पाहत आहे. त्यामुळे आपण जे बोलतोय, जे करतोय ते बरोबर आहे का? त्यांनी स्वतःच्या मनाला विचारावं. असा पलटवार गोऱ्हे यांनी केला.
शिवसेना-भाजप युतीत आम्हाला उपमुख्यमंत्रीपद मिळणार होतं. पण मला उपमुख्यमंत्रीपद द्यावं लागेल म्हणून शिवसेनेने घेतलं नाही. असा मोठा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी केला. त्यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या,आमच्या पक्षात एक शिस्त आहे. त्यावेळी काय चर्चा झाली हे उद्धव ठाकरेच सांगतील. पण तुम्ही आता मुख्यमंत्री आहात. राज्याचा कारभार पाहत आहात. तुम्ही इयत्ता पाचवीत गेल्यावर इयत्ता पहिलीचा विचार का करता? असा खोचक सवाल गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. तसेच तुमच्याकडे जे काम आहे. ते चांगलं करा, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
