महाविकास आघाडी तोडून उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत युती करावी -विजय शिवतारे
पुणे ,:एकनाथ शिंदे यांच्या गटात आतापर्यंत ५१ आमदार सामिल झाले असून राष्ट्रवादी-काँग्रेसच्या त्रासाला कंटाळून आम्ही फारकत घेतल्याचे अनेक आमदारांनी आतापर्यंत स्पष्ट केलं आहे. महाविकास आघाडीत राहून शिवसेनेचं नुकसान होतंय.राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा अन्याय सहनशक्तीच्या पलिकडे गेल्याने आमदारांना फारकत घ्यावी लागली . काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरची आघाडी तोडूनउद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत युती करावी असे शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हणाले.
आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
विजय शिवतारे म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडून खूप त्रास झाला. अन्याय झाला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावे, अशी आमची विनंती आहे. ही विनंती आम्ही वेळोवेळी सांगितली. पण आमच्या विनंतीला प्रतिसाद मिळाला नाही. याउलट बंडखोर आमदारांची निर्भत्सना करण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ५१ आमदारांचं म्हणणं ऐकून घेत महाविकास आघाडीतून बाहेर पडावं अशी विनंती विजय शिवतारे यांनी केली आहे.
विजय शिवतारे म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेला ९० लाख ४९ हजार मते मिळाली. यापैकी ५१ आमदारांना ४६ लाख मतं आहेत. २०१९ ची निवडणूक युतीसोबत लढलो. म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सेनेच्या विरोधात उभे ठाकले होते. पण शेवटी भाजपसोबतची युती तोडावी लागली. तीनवेळा खासदार राहिलेले शिवाजी अढळराव पाटील यांनीही अनेकवेळा विनंती केली. शिवसैनिकांना जगू द्या, अशी विनंती करत लेखी पत्राद्वारे त्यांनी लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र, त्यांच्या विनंतीलाही संरक्षण मिळाले नाही.
आम्ही १०० टक्के बाळासाहेबांच्याच विचारांचे शिवसैनिक आहोत. उद्धव ठाकरेही आमचेच आहेत. उद्धव ठाकरे प्रचंड सज्जन आहेत. पण, त्यांना त्यांच्याच चक्रव्युवाहत घेरलं गेलं आहे, असंही विजय शिवतारे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, शिवसेना, शिवसेनेचे शिलेदार, संघटना टिकली पाहिजे असं आम्हालाही वाटतं. पण ५१ आमदारांनी सांगितल्यानंतरही उद्धव ठाकरे चक्रव्युहातून बाहेर पडत नसतील तर काय करायचं हा प्रश्न उभा राहतो.
त्यामुळे महाविकास आघाडी विसर्जित करून मार्ग काढावा. याकरता ठराव आणि पत्र आम्ही पुन्हा पाठवणार आहोत, असंही विजय शिवतारे म्हणाले.
