नवतेला परंपरेची जोड मिळाली नाही तर ती उठवळ : तालयोगी पं. सुरेश तळवलकर
पुणे : शास्त्र, तंत्र, विद्या आणि कला या चार स्तरांवर संगीत बांधले गेले आहे. गुरूकडून मिळालेले ज्ञान कलेच्या रूपाने जेव्हा शिष्याच्या अंत:करणातून सादरीकरणाद्वारे समोर येते तेव्हाच गुरूचे आशीर्वाद खऱ्या अर्थाने मिळाले आहेत असे समजले जाते, असे प्रतिपादन पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांनी केले. परंपरेमध्ये नवता हवी पण त्या नवतेला परंपरेची जोड मिळाली नाही तर ती नवता उठवळ होते, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
भारताच्या ऐतिहासिक आणि कालातीत गुरू-शिष्य परंपरेचा वारसा अव्याहतपणे सुरू राहावा, आश्वासक युवा कलावंतांना कलोपासनेसाठी प्रोत्साहन मिळत राहावे या उद्देशाने तसेच भारतीय अभिजात कला आणि संस्कृती संवर्धनासाठी पुण्यासह मुंबई-ठाणे येथे 25 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्टतर्फे तालतपस्वी कै. पंडित मधुकर कोठारे (लंडन) स्मृती उत्तुंग संगीत शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यात पंडित तळवलकर बोलत होते. पंडित विजय कोपरकर, पंडित हेमंत पेंडसे, उत्तुंगच्या विश्वस्त प्रसिद्ध गायिका आशा खाडिलकर, माधव खाडिलकर मंचावर होते.
या वर्षीच्या शिष्यवृत्तीसाठी पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांचे शिष्य ईशान परांजपे (तबला), रोहित खवळे (पखवाज) आणि शास्त्रीय गायक, संगीतकार पंडित हेमंत पेंडसे यांचे शिष्य तेजस मेस्त्री (शास्त्रीय गायन) यांची निवड करण्यात आली होती. त्यांना पंडित विजय कोपरकर यांच्या हस्ते ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. प्रत्येकी 20 हजार रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे स्वरूप होते.
पंडित सुरेश तळवलकर म्हणाले, गुरू-शिष्य परंपरेत शास्त्र समजावले जाते, तंत्र शिकविले जाते, विद्या दिले जाते तर कला संस्कारित होते. समर्पण, भक्ती, कष्ट करण्याची तयारी, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा आणि निष्ठा हे सहा गुण शिष्याकडे असावेत, अशी अपेक्षा गुरू ठेवतात, परंतु ते गुण गुरुकडेही असणे अपेक्षित आहे. गुरू-शिष्य परंपरेशिवाय संगीत पुढे जाऊच शकत नाही. संस्कारांमध्ये प्रचिती आहे, प्रचितीमध्ये अनुभूती आहे आणि जेव्हा अनुभूतीचा अमाप संचय होतो तेव्हा ज्ञान प्राप्त होते.
उत्तुंग सांस्कृतिक परिवार टस्ट्रची माहिती ओंकार खाडिलकर यांनी प्रास्ताविकात दिली. मान्यवरांचा सत्कार आशा खाडिलकर यांनी केला. कार्यक्रमाची सुरुवात मानसी दीक्षित आणि श्रुती देवस्थळी यांनी गायलेल्या उत्तुंग स्फूर्तीगीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.
