Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारताच्या सर्वांगीण विकासाच्या प्रयत्नांना दिशा देईल : प्रा. अनिल सहस्रबुद्धे

पुणे: शिमला येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा २९ मे रोजी समारोप झाला. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (AICTE) अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे यांनी रविवारी बैठकीच्या शेवटच्या दिवशी देशभरातील प्रतिनिधींना संबोधित केले.

राष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या बैठकीत ‘शिक्षण क्षेत्रातील राज्य सरकारांचा अनैतिक हस्तक्षेप थांबवा’, ‘सध्याची राष्ट्रीय परिस्थिती’, ‘विद्यार्थी केंद्रीत आणि भविष्याभिमुख राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’, ‘ स्वावलंबी भारत बनवण्याच्या दिशेने तरुणांनी वाटचाल करावी’ असे चार प्रस्ताव पारित करण्यात आले. हे ठराव मंजूर करण्यापूर्वी प्रतिनिधींनी त्यावर सविस्तर चर्चा केली.

कोरोना कालावधीनंतर आंतरराज्य विद्यार्थी जीवन दर्शन (SEIL) प्रकल्प पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा झाली. या प्रकल्पाद्वारे ईशान्येकडील राज्यांतील विद्यार्थ्यांना भारतातील विविध भागांना भेटी देऊन त्यांना भारतातील विविधतेची ओळख करून दिली जाते.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष प्रा. अनिल डी. सहस्रबुद्धे म्हणाले, “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे भारतीय ज्ञान परंपरा नवीन पिढीपर्यंत पोहोचेल. प्राचीन काळात भारतीय अर्थव्यवस्था खूप मजबूत होती आणि आयुर्वेदासह विविध क्षेत्रात भारत अग्रेसर होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्वच क्षेत्रात सातत्याने वाढ झाली आहे. आता प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी झपाट्याने प्रयत्न करावे लागतील. अभाविप ने ‘उन्नत भारत’ सारख्या मोहिमेद्वारे देशातील तरुणांना स्वावलंबनाच्या मार्गावर नेण्यासाठी उल्लेखनीय प्रयत्न केले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची ज्या प्रकारे चर्चा करण्यात आली आहे, ती आपण यशस्वी करून राष्ट्रीय पुनर्निर्माणाचे उद्दिष्ट साध्य करू शकतो.

अभाविपच्या राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी म्हणाल्या, “अभाविपची ही महत्त्वाची बैठक आपले निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी ठरली आहे. विविध विषयांवर देशभरातील प्रतिनिधींची मते संघटनात्मक उपक्रमांना दिशा देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील. आम्ही अभाविप स्थापनेच्या ७५ व्या वर्षासाठी निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.”

अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री प्रेरणा पवार म्हणाल्या, “अभाविप स्थापनेच्या ७५ व्या वर्षात १ कोटी सदस्यसंख्येचे उद्दिष्ट अभाविप ने निश्चित केले आहे. विकासार्थ विद्यार्थी व अभाविपच्या वतीने देशाच्या विविध भागात एक कोटी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी देशातील २ लाख गावांमध्ये ‘एक गाव, एक तिरंगा’ मोहीम राबवण्यात येणार आहे.

येणाऱ्या नविन शैक्षणिक वर्षात अभाविप त्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे, त्याचे औचित्य साधून विद्यार्थी हितात अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्य अभाविप पश्चिम महाराष्ट्र करेल. याच सोबत, विद्यार्थी सदस्यता अभियानाला लवकरच सुरूवात होणार आहे. या अभियानात पश्चिम महाराष्ट्र प्रांतात ३ लाखांहून अधिक सदस्यता नोंदविण्याचे लक्ष पश्चिम महाराष्ट्र प्रांताने ठेवलेले आहे. प्रांतातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांच नेतृत्व करण्यासाठी प्रांतातील एकूण ७०५ महाविद्यालयात आपली शाखा उभी करण्याचे उद्दिष्ट विद्यार्थी परिषदेने ठेवले आहे. २०१७ नंतर यावर्षी विद्यापीठात सिनेट निवडणूक होणार आहेत. यामध्ये अभाविप विद्यापीठ विकास मंच म्हणून निवडणूक लढेल, याची तयारी देखील सुरू झाली आहे. अशी माहिती अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री अनिल ठोंबरे यांनी दिली. या वेळी पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading