Friday, June 5, 2026
BusinessLatest News

नियोजनाअभावी केलेल्या बांधकामाने वातावरणावर प्रचंड ताण – वास्तुविशारद सी. आर. राजू यांचे प्रतिपादन

पुणे : “महाराष्ट्र आणि देशभरात गेल्या दोन दशकांत अनेक बाबतीत विकास घडला आहे, ज्यामुळे नैसर्गिक बदल होऊन वातावरणावर प्रचंड ताण आला आहे. पायाभूत सुविधा नसताना, नियोजन न करता इमारती बांधल्या जात आहेत. त्यामुळेच आपल्याला सूचनांनुसार बदल करण्यासाठी आणि निर्णयांची पूर्तता होते आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी सरकारी संस्था आणि आयआयए यांना सामील करून घ्यावे लागणार आहे. आपण विकासाबद्दल बोलतो. परंतु, सध्याच्या मोठ्या प्रमाणातील बांधकामांनी जमिनीवर ताबा मिळवला आहे. ज्याची खरंच गरज नाही,” असे मत सी. आर. राजू यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस् (आयआयए) महाराष्ट्र चॅप्टर पुणे रेंटरच्या २४ व्या महाकॉन अधिवेशनात व्यक्त केले.

आज झालेल्या कार्यक्रमात अहमदाबाद येथील एचपीसी डिझाइन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे बिमल पटेल, आयआयए महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष संदीप बावडेकर, आयआयए पुणे चॅप्टरचे अध्यक्ष संदीप खाटपे, मुंबई येथील फोल्ड्स डिझाइन स्टुडिओचे कृष्णा मूर्ती, पुणे येथील सुमन शिल्पचे महेश नामपूरकर, मनोज तातुसकर आणि विकास अचलकर यावेळी उपस्थित होते.

ज्येष्ठ वास्तुविशारद प्रकाश देशमुख यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर संस्थेच्या इतर सदस्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

“आमच्या पूर्वजांनी अशी घरे बांधली जी शेकडो वर्षे टिकू शकतात. परंतु, आजच्या इमारतींची जीवनचक्र कमी कालावधीचे आहे. याचा अर्थ असा आहे की, आपण आपल्या नैसर्गिक संसाधनांचा कुठे अपव्यव करीत आहोत याचा आपण विचार करायला हवा. सिमेंटची जंगले बांधणे आपल्याला टाळावे लागेल, असे मत सी. आर. राजू म्हणाले. तसेच महाराष्ट्रात वास्तुविशारद महाविद्यालयांची संख्या मोठी असल्याने हा व्यवसायाचा केंद्रबिंदू असल्याचेही ते म्हणाले.

“काही तरुण वास्तुविशारद नावीन्यूपूर्ण पद्धतींचा अवलंब करीत आहेत. अशा प्रकारच्या परिषदांमधून नावीन्यपूर्ण कल्पना पुढे आणायला हव्यात. त्यांनी केलेल्या कार्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. जेणेकरून त्यातून इतरांना नवीन शिकायला मदत होईल आणि सराव घेता येईल. ग्रामीण भागातील अशा लोकांकडूनही आपण शिकू शकतो ज्यांच्याकडे बांधकाम तंत्र आणि कल्पना आहेत,” असेही ते म्हणाले.

अहमदाबाद येथील साबरमती नदीकिनारी बांधलेल्या सार्वजमिक प्रकल्पांवर आधारित सार्वजनिक प्रकल्प आणि सामाजिक जीवन या विषयावर बोलताना बिमल पटेल म्हणाले, “सार्वजनिक प्रकल्प हे असे प्रकल्प आहेत जे सार्वजनिक प्राधिकरणांच्या परवानगीने सार्वजनिक समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक मालमत्तेवर सार्वजनिक पैशाने केले जातात. म्हणूनच ते सार्वजनिक जीवन निर्माण करण्यास बांधील आहेत. मात्र, विसंवाद आणि चर्चा होऊनही एखादा प्रकल्प पुढे जावा लागतो. सुजाण तर्कशुद्ध आणि रचनात्मक विवेचनामुळे लोकशाही बळकट होऊ शकते. तसेच प्रकल्प सुधारण्यास आणि त्यांना पुढे नेण्यास मदत होऊ शकते. परंतु, अतर्क्य, काल्पनिक आणि माहिती नसलेल्या गोष्टी जनतेची दिशाभूल करू शकतात. तसेच प्रकल्पामध्ये व्यत्यय आणू शकतात. सरकारी संस्था आणि व्यावसायिकांना प्रकल्प सुधारण्यासाठी जनतेला कसे गुंतवून ठेवायचे हे शिकण्याची गरज आहे आणि सार्वजनिक चर्चा अधिक चांगल्या प्रकारे माहिती होईल याची खात्री करणे आवश्यक आहे.”

संदीप बावडेकर म्हणाले, “स्थित्यंतर हा केवळ आपल्या संस्कृतीचाच नव्हे, तर आपल्या अस्मितेचाही अविभाज्य घटक आहे. स्थापत्यशास्रातील काही ज्येष्ठ व्यक्तींशी संवाद साधण्याच्या उद्देशाने आम्ही महाकॉन २०२२ साठी ‘स्थित्यंतर’ हा विषय जाहीर केला आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading