धार्मिक भावनांचं जाहीर प्रदर्शन करु नये – शरद पवार
पुणे : प्रत्येकाने आपल्या धार्मिक भावना अंत:करणात ठेवाव्यात, घरात ठेवाव्यात.धार्मिक भावनांचं जाहीर प्रदर्शन करु नये. त्याच्या आधारावर अन्य घटकांच्या संबंधी एकप्रकारचा द्वेष निर्माण होऊन त्याचा परिणाम समाजावर दिसू लागतात. महाराष्ट्रात असं वातावरण कधीच नव्हतं,” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले , अलिकडच्या काळात राज्यात व्यक्तिगत गोष्टी होत आहेत. यापूर्वी महाराष्ट्रात सत्ताधारी-विरोधक यांच्यावरील टीका ही भाषणापुरती मर्यादित होती. ही परंपरा यशवंत चव्हाण यांच्यापासून सुरु होती. विधीमंडळात अनेक वेळा विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील चर्चा टोकाची होती. पण ही चर्चा संपल्यानंतर एकत्र बसून राज्याच्या हितासंबंधी विचार करत असत, ही महाराष्ट्राची परंपरा. पण दुर्दैवाने महाराष्ट्रात अलिकडे नाही त्या गोष्टी बघायला मिळतात. मुख्यमंत्र्यांवर धोरणात्मक टीका करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. पण त्यांचं एकेरी नाव घेऊन त्यांच्यावर वेडंवाकडं बोलणं शोभत नाही. मुख्यमंत्री ही संस्था आहे, या संस्थेचा मान ठेवला पाहिजे.असे शरद पवार म्हणाले.
किरीट सोमय्या यांच्या दिल्ली दौऱ्यावरुनही शरद पवार यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले की, अस्वस्थ असलेल्या लोकांनी कुठले कुठले मार्ग उपलब्ध आहेत, त्याच्या खोलात जाणार. त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही. राष्ट्रपती राजवटीची दमदाटी केली जाते, त्याचे परिणाम होत नाही. निवडणुकीची वेळ आली तर त्याचे काय परिणाम होतात हे कोल्हापूरने सांगितलं आहे.”