भारतीय न्यायव्यवस्थेचे पावित्र्य महत्त्वाचे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे मत
पुणे: वकिलाने नैतिक मूल्य बाळगली पाहिजेत.आपल्याल्या भारतीय न्यायव्यवस्थेचे पावित्र्य खूप महत्त्वाचे आहे आणि त्यात वकिल हे योगदान देत असतात. त्यामुळे वकिलांनी आपल्या व्यवसायाचे पावित्र्य राखायला हवे. अनेक प्रसंगी मन द्विधा मनस्थितीत अडकते, परंतु मन सक्षम असेल तर मनाची युद्धभूमी करून कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळू शकते,असे मत ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
श्री शिवाजी मराठा सोसायटी विधी महाविद्यालयाच्या वतीने उज्ज्वल निकम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख, श्री शिवाजी मराठा सोसायटीचे मानद सचिव अण्णा थोरात, विकास गोगावले, जगदीश जेधे, धनाजी जेधे, शेखर शिंदे, कमलताई व्यवहारे, अॅड. तानाजी घारे, अॅड. सचिन शिंदे, प्राचार्य डाॅ. विश्वनाथ पाटील उपस्थित होते.
उज्ज्वल निकम म्हणाले, गुन्हेगाराचा हेतू पोलीस तपासात येतो.परंतु गुन्हे करण्याची वृत्ती का आली हे आरोपीशी बोलण्यातून कळते. चित्रपट कलावंतानी कोणताही गुन्हा केला, तरी लोकांची सहानुभूती अजूनही चित्रपट कलावंतांकडे असते. चित्रपट कलावंतांच्या आकर्षणापोटी कोण काय करत आहे याकडे समाज दुर्लक्ष करतो.
ते पुढे म्हणाले, वकिली व्यवसायात ज्ञान आणि हुशारी दोन्ही आवश्यक आहे. ज्ञान संपादन करता येऊ शकते, परंतु हुशारी ही मिळवावी लागते आणि ती मिळविण्यासाठी तर्कशास्त्र अनुमान कसा काढायचा याची सवय लावा. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड बाळगू नका. आत्मविश्वास असेल तर कोणत्याही खटल्यातच नाही तर आयुष्यात यश मिळेल, असेही त्यांनी सांगितले.