पृथ्वीराज पाटीलला रोख बक्षीसच मिळाले नाही; महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील धक्कादायक प्रकार
कोल्हापूर – महाराष्ट्र केसरी किताबचा विजेता कोल्हापूरचा मल्ल पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या प्रकाश बनकरला आस्मान दाखवत मानाची गदा मिळवली. मात्र या स्पर्धेनंतर बक्षीसच न मिळाल्याची खंत पृथ्वीराज पाटील याने बोलून दाखवली. या घटनेमुळे आता सर्वत्र संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. जागतिक कुस्ती स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या सोनबा गोंगाने यानेसुद्धा आवाज उठवला. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज पाटीलला भाजपाकडून ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
या घटनेबद्दल बोलताना गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, पृथ्वीराज पाटील यांना बक्षीस देणे गरजेचे आहे, जर ते दिले गेले नसेल तर नक्कीच बक्षीस का दिले गेले नाही याची माहिती घेतली जाईल. मल्ल प्रचंड मेहनतीने हा किताब मिळवतात बक्षीस देण्याची जबाबदारी जर शासनाची असेल तर शासनाकडून हे बक्षीस दिले जाईल आणि जर ही जबाबदारी आयोजकांची असेल तर आयोजकांना सूचना दिल्या जातील. मात्र बक्षीस न देणे ही मोठी चूक असल्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी दोन लाखांचे बक्षीस जाहीर केले. तर भाजपने 5 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.