Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

मराठे ज्या लढाया हरले, त्या केवळ फितुरांमुळे : प्रा. डॉ. प्रमोद बोराडे

पिंपरी: शिवचरित्रही हेच सांगते की युद्धात मागे हटायचे नाही, शरणागती पत्करण्याची नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेल्या लढाया भावनिक न होता संपूर्ण नियोजन करून केल्यानेच अगदी कमी मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी बलाढ्य शत्रूला पराजित केले आणि मराठे ज्या लढाया हरले, त्या केवळ फितुरांमुळे, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. डॉ. प्रमोद बोराडे यांनी केले.

श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्तपणे आयोजित स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष व उद्योजक रामदास काकडे, जी. एस. टी. उपायुक्त सुनिल काशिद, श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक संतोष खांडगे, विवेक गुरव, सोनबा गोपाळे, सुमती निलवे, बाळासाहेब शिंदे, विलासराव काळोखे, मच्छिंद्र घोजगे, दादासाहेब ऊर्हे , मिलिंद शेलार, सुदाम दाभाडे, शंकर हदिमणी, सुनिल कोल्लम, विलास भेगडे, पांडुरंग पोटे, विल्सेन्ट सालेर, सचिन कोळवणकर, ज्योती नवघणे, सुवर्णा मते, उमाकांत कुलकर्णी, बी.जी.पाटील, दशरथ जांभुळकर, विलास टकले, विल्सेंट सालेर, योगेश शिंदे, युवराज पोटे, भगवान शिंदे आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. प्रमोद बोराडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय कीर्ती गाजवली. प्लासीच्या लढाईतच भारत स्वतंत्र झाला असता, पण केवळ नेतृत्व अभाव आणि फितुरांमुळे मराठे ती लढाई हरले. होळकरांनी दिल्ली जिंकली होती, पण केवळ मराठ्यांमधील फितुरीमुळे हे शक्य झाले नाही. युद्धाची परंपरा पाहिल्यास फितूर नसते तर आपण जिंकलो असतो. त्यामुळे दैनंदिन जीवनातही आपण फितूर दूर करायला शिकले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणतीही लढाई लढताना तयारी केल्याशिवाय पाऊल टाकले नाही. अगदी स्वराज्याची राजधानी ठरवतानाही त्यांनी दहा वर्षे अगोदरपासून तयारी सुरू केल्याचे दिसते. बलाढ्य अफजल खानाला भेटायला जातानाही ते पूर्ण तयारीनिशीच गेले होते. खानाला मारायला त्यांना चार शस्त्रे वापरावी लागली, यातून त्यांचे नियोजन दिसून येते.

दरम्यान, रुद्र बोराडे या अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकल्याने 114 किल्ले सर केल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्याचा सत्कार करून गौरविण्यात आले. प्रास्ताविक विलास भेगडे यांनी, सूत्रसंचालन कुसुम वाळुंज व लक्ष्मण मखर यांनी, तर शंकर हदिमणी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading