Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

सामाजिकशास्त्रांच्या विद्यार्थ्यांना सीएसएसएच संशोधनवृत्तीमुळे कोविडकाळातही संशोधन करण्याची प्रेरणा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे व मानव्य विद्या प्रणालीमधील विविध विभागाच्या विद्यार्थ्यांनी कोविडकाळात केलेल्या संशोधनावर आधारित चर्चासत्र दि. २५ व २६ मार्च २०२२ रोजी संपन्न झाले. आंतरप्रणाली अभ्यास केंद्राच्या प्रमुख प्रा. राजेश्वरी देशपांडे आणि लिंगभाव अभ्यास विभागप्रमुख प्रा. अनघा तांबे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार झाला.

कोविड काळात विद्यार्थ्यांना प्राध्यापकांसोबत संवाद आणि आपापल्या विषयाच्या प्रत्यक्ष क्षेत्रभेटीचा अनुभव यांपासून वंचित रहावं लागू नये म्हणून सामाजिकशास्त्रे प्रणालीतील विद्यार्थ्यांसाठी एक ‘संशोधन अनुदान स्पर्धा’ आयोजित केली गेली. एम ए च्या विद्यार्थ्यांनी आपापल्या विभागातील प्राध्यापकांच्या व विभाग प्रमुखांच्या मदतीने ‘कोविड १९ नंतरची आव्हाने’ या विषयाशी संबंधित कोणताही संशोधन प्रकल्प हाती घेऊन त्याचा प्रस्ताव स्पर्धेसाठी पाठवायचा होता. या प्रस्तावांची छाननी होऊन एकूण पंधरा प्रस्ताव मान्य झाले. त्यांना प्रत्येकी ५००० रुपयांचं संशोधन अनुदान जाहीर झालं. विद्यार्थ्यांनी आपापल्या मार्गदर्शकांच्या साहाय्यानं संशोधन पूर्ण करून त्यावर आधारित निबंध लिहून तो आंतरप्रणाली केंद्राला सादर केला.

कोविडनंतर सर्व वर्ग पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यावर अनुदान विजेते विद्यार्थी आणि त्यांच्या विभागातील त्यांचे सहाध्यायी यांच्यासाठी संशोधन चर्चासत्र आयोजित केलं गेलं. सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या विषयावर सादरीकरण केलं. कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या परिणामांपासून ते मुघलकालीन सम्राटांनी नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी कसकसे उपाय योजले होते अशा वैविध्यपूर्ण विषयांवर संशोधन निबंध सादर झाले. त्यावर विद्यार्थी संशोधकांनी प्रश्न विचारून शंकासमाधान करून घेतले.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. करमळकर यांनी आवर्जून या कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना संशोधन करण्यास प्रवृत्त करण्याचं महत्त्व अधोरेखित केलं, आणि असेच शैक्षणिक प्रयोग सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली. अनुदानप्राप्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबाबत आनंद व्यक्त केला. कोविडकाळात या अनुदानामुळे मनाला उभारी मिळाली. प्राध्यापकांसोबत संवाद ठेवल्यामुळे संशोधनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला आणि अनुदान मिळाल्यामुळे आपण केलेल्या कामाचं विद्यापीठ कौतुक करत आहे याचं समाधानही मिळालं असं त्यांनी सांगितलं.

या संशोधनातून मिळालेला आनंद पाहता आपण पुढे पीएच. डी. करणार असल्याचा निर्धार अनुदानविजेत्या वैशाली कांबळे या दिव्यांग विद्यार्थिनीने बोलून दाखविला. या निमित्तानं विद्यापीठ परिसर पुन्हा एकदा विद्यार्थी, चर्चा आणि हास्यविनोदांनी गजबजल्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading