विज्ञानाने निराकरण, उद्योगाने परिवर्तन तर नवोपक्रमाने प्रभाव टाकला पाहिजे: डॉ. रघुनाथ माशेलकर
पुणे : विज्ञानाने आपल्या समस्यांचे निराकरण व्हायला हवे, उद्योगाने परिवर्तन घडवून आणावे तर नवोपक्रमांनी प्रभाव टाकावा असे आवाहन विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्याख्यानात ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाकडून २००७ पासून सुरू असणाऱ्या ‘शनिवार संवाद’ या व्याख्यानमालेत अनेक विज्ञान तसेच सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींकडून विभागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. जवळपास १५ वर्षांपासून सुरू असणाऱ्या या व्याख्यानमालेचे १५० वे पुष्प नुकतेच पार पडले. यावेळी डॉ. माशेलकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.नितीन करमळकर, विभागाच्या प्रमुख डॉ. करिश्मा परदेसी, प्रा. राजेंद्र देवपूरकर, प्राध्यापक डॉ. अतुल भारदे आदी ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते. तसेच अनेक विद्यार्थी या व्याख्यानात सहभागी झाले होते.
डॉ. माशेलकर यांनी यावेळी भारतात वैज्ञानिक क्षेत्रातील संशोधन या विषयावर आपले विचार व्यक्त केले. यावेळी त्यांनी स्वतःच्या वैज्ञानिक प्रवासाची आणि भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीची माहिती दिली. तरुण पिढीने संशोधनाच्या पारंपरिक मार्गांच्या पलीकडे पाहण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच वैज्ञानिक मॉडेल्स तयार करणे, हायड्रोजन इंधन तंत्रज्ञान प्रकल्प इत्यादींसारख्या स्वतःच्या वैज्ञानिक अनुभवातून उदाहरणे देऊन भारतात नावीन्य आणण्याचे आवाहन त्यांनी केले. विज्ञान तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात जागतिक आघाडीचा दर्जा प्राप्त करण्यासाठी भारताला काय आवश्यक आहे याचा विचार खासकरून तरुण वैज्ञानिकांनी करावा असेही ते यावेळी म्हणाले.यावेळी डॉ.करमळकर यांनी विद्यापीठात उभालेल्या C4I4 इंडस्ट्री 4.0, एसपीपीयू रिसर्च पार्क फाऊंडेशन आदींबाबत माहिती दिली. तसेच कोव्हिड काळात विद्यापीठाने केलेल्या संशोधनाचीही माहिती त्यांनी दिली.
यावेळी डॉ.करमळकर यांनी विद्यापीठात उभालेल्या C4I4 इंडस्ट्री 4.0, एसपीपीयू रिसर्च पार्क फाऊंडेशन आदींबाबत माहिती दिली. तसेच कोव्हिड काळात विद्यापीठाने केलेल्या संशोधनाचीही माहिती त्यांनी दिली.
