Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

आंबिल ओढ्याच्या उगमापासून ते संगमापर्यंत नैसर्गिक पात्राला तडजोड होऊ नये

पुणे : आंबिल ओढ्याचा इतिहास  जाणून घ्यायला हवा. आंबिल ओढ्याच्या उगमापासून ते मुठा नदीपर्यंत होणा-या संगमापर्यंत नैसर्गिक पात्राला तडजोड  होता कामा नये. या संपूर्ण परिसरात झालेल्या अतिक्रमणांमुळे पुराचा धोका वेळोवेळी सतावत आहे. त्यामुळे यापरिसरातील सर्वच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. दांडेकर पुलाजवळील असो  किंवा इतर भागातील बाधित नागरिकांना  त्यांची हक्काची पक्की घरे मिळायला हवीत. पात्र-अपात्र या घोळात त्यांचे छप्पर दूर करणे चुकीचे आहे, असे मत पुणे मनपा मधील सर्वपक्षीय प्रतिनिधी, पर्यावरण तज्ञ् व सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

पुणे महानगर परिषदेतर्फे आंबील ओढा कथा एक-व्यथा अनेक या चर्चासत्राचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले. यावेळी पुणे महानगर परिषदेतर्फे आंबिल ओढ्यावरील माहितीपट दाखवण्यात आला आणि डॉ. श्रीकांत गबाले यांनी परिषदेतर्फे अभ्यासपूर्ण  प्रेझेंटेश दाखवले. पर्यावरणविषयक तज्ञ व अभ्यासक अ‍ॅड.असिम सरोदे, सारंग यादवाडकर, डॉ. श्रीकांत गबाले, अभिजीत घोरपडे, सौरभ मराठे यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसंत मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे  सुभाष जगताप, भारतीय जनता पक्षाचे श्रीनाथ भिमाले, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार, आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत, शाम देशपांडे, धनंजय जाधव, सचिन निवंगुणे आदिंनी आपले विचार मांडले. पुणे महानगर परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड.गणेश सातपुते यांनी चर्चासत्राचे आयोजन केले.

अ‍ॅड.असिम सरोदे म्हणाले, निवासाचा हक्क प्रत्येकाला मिळायला हवा. पर्यावरण विषयक समस्यांकरीता न्यायालयाने तज्ज्ञाची समिती नेमून  त्यांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. लोकसहभागातून पर्यावरणविषयक काम झाल्यास बाधितांना न्याय मिळणे सोपे जाईल. कोणतेही पुर्नवसन करताना नदी-नाले यांचे विस्थापन करून  चालणार नाही. त्याकरिता वेगळी व्यवस्था आहे.

सारंग यादवाडकर म्हणाले, आंबिल ओढा दुर्घटनेची २०१९ ची घटना हा  ट्रेलर होता. सिनेमा अजून बाकी आहे. या सिनेमाचे निर्माते राजकारणी व प्रशासक आहेत. आंबिल ओढ्याच्या उगमापासून प्रचंड प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे या प्रश्नावर शास्त्रीय पद्धतीने मार्ग काढायला हवा.

श्रीनाथ भीमाले म्हणाले, कोणत्याही घरावर कारवाई ही चुकीची आहे. प्रत्येकाला हक्काचे घर मिळायला हवे. विकासक  असो वा प्रशासक असो सामान्य नागरिकांवर अन्याय झाला, तारा लोकप्रतिनिधी त्यांच्या सोबत आहेत. वसंत मोरे म्हणाले, आंबिल ओढ्याबाबत कात्रज भागापासून अडचणी सुरु आहेत. कात्रज च्या पलीकडून पाण्याचा प्रवाह ओढ्यात येतो. नगरसेवक म्हणून आम्ही नागरिकांना नेहमीच याबाबतच्या अडचणींमध्ये मदत करतो.

सुभाष जगताप म्हणाले, सन १९५९ मध्ये नाला सरळीकरणाचा विषय होता. पाण्याचा प्रवाह सरळ जाणे आवश्यक आहे. आंबिल ओढा दुर्घटनेत सरळीकरण भागातील घरे बाधित झाली. त्यामुळे निसर्गाचा पाण्याचा प्रवाह आपण थांबविता कामा नये. सचिन निवंगुणे म्हणाले, दुर्घटनेत वित्तहानी खूप मोठया प्रमाणात झाली. आता प्रत्येकाला पक्की घरे मिळायला हवी. कोणताही गैरसमज याबाबत पसरवता कामा नये.

अ‍ॅड.गणेश सातपुते म्हणाले, आंबिल ओढ्याबाबत सर्व अडचणी व  समस्या आपण समजून घ्यायला हव्या. यासाठी हे व्यासपीठ व खुली चर्चा ठेवण्यात आली. आंबील ओढयाचा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा, येथील स्थानिकांच्या समस्यांचे निराकरण व्हावे तसेच पर्यावरणाचा समतोल राखला जावा, यादृष्टीने पावले उचलण्याकरीता चर्चा करण्यात आली. शाम देशपांडे, धनंजय जाधव, मुकुंद किर्दत, डॉ. श्रीकांत गबाले, अभिजीत घोरपडे, सौरभ मराठे यांसह बाधित गृहनिर्माण संस्थेच्या प्रतिनिधींनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. महेश महाले यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading