पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवार म्हणाले, मला वाटेल तेव्हा मी बोलेन, तो माझा अधिकार
पुणे : राज्यात सत्तास्थापनेच्या संघर्षात पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा आता मागे सरला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे त्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. “पहाटेच्या शपथविधीसाठी तुम्हीच अजित पवार यांना पाठवलं होतं’, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला असता, त्यांनी मी पाठवलं असतं तर सत्ता स्थापन झाली असती.” यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “या विषयी मला वाटेल तेव्हा मी बोलेन, तो माझा अधिकार.”
उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. या मुद्द्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता ते चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.
अजित पवार म्हणाले, बघा याबाबत मी वारंवार बोललो आहे आणि तरीही तुम्ही तेच तेच उगाळत बसले आहात. त्याबद्दल मी अगदी स्पष्टपणे याआधीच सांगितले आहे की मला वाटेल तेव्हा मी बोलेन. तो माझा अधिकार आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेऊन महाविकास आघाडी सरकारनं असमजूतदारपणा दाखवून दिला आहे अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना काही जणांना समजूतदारपणा काय आणि असमजूतदारपणा काय हेच कळत नाही. आम्ही निवडणूक घ्यायला तयार होतो. पण राज्यपालांनी नकार दिला. त्यामुळे आम्ही त्यांच्या आदेशाचं पालन करत समजूतदारपणाचच काम केलं आहे, असं अजित पवार म्हणाले.
