पर्यावरण रक्षण हे राष्ट्रभक्तीचेच एक रूप : डॉ. रामचंद्र देखणे
पुणे : अव्यक्त परमात्म्याचे व्यक्त रूप म्हणजे निसर्ग. निगर्स हा ज्ञानमूर्ती आणि महान दाता असून पर्यावरण हेच परमात्म्याचे अंगण तर निसर्ग घटकांचे साजिवंतपण हेच विश्वाचे चैतन्य होय. पर्यावरण रक्षण हे राष्ट्रभक्तीचेच एक रूप आहे. राष्ट्रनिष्ठेचा उगम हा भूमीनिष्ठेतून झाला आहे. कर्तव्यधर्म, संस्कृती आणि मातृभूमीवरील निष्ठा एकरूप झाल्याशिवाय राष्ट्रभक्ती ही संकल्पना रुजत नाही. निसर्गाकडे पाहण्याची एक कृतज्ञ दृष्टी हवी अन् निसर्गाशी भावनिक नाते जडायला हवे, असे विचार संतसाहित्याचे व लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक आणि राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आज (दि. 26 डिसेंबर 2021) पुण्यात एकदिवसीय चौथ्या राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन पर्यावरणप्रेमी आणि ज्येष्ठ समाजसेविका स्वयंप्रभादेवी मोहिते–पाटील यांच्या हस्ते झाले. संमेलनाचे संयोजक ट्रस्टचे विश्वस्त, देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने, स्वागताध्यक्ष ज्येष्ठ लेखक व विचारवंत, यशदाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. बबन जोगदंड, वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, अॅड. नंदिनी शहासने, डॉ. जयश्री तोडकर, साहित्यिक श्याभ भुर्के, विभागीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले आदी विचारमंचावर होते. कार्यक्रमाची सुरुवात हरिपाठे झाली. हरिपाठाचे गायन श्रीपाद कोंडे–देशमुख, गायत्री कोंडे–देशमुख, मंदार गोखले यांनी केले.
डॉ. देखणे म्हणाले, निसर्गातील सारेच घटक मानवाला काहीतरी देण्यासाठी सदैव तत्पर आहेत. भारतात अनंत काळापासून चालत आलेली कृषिसंस्कृती आणि दुसरीकडे तत्त्ववेत्यांनी सांगितलेले पंचमहाभूतांचे महत्त्व या दोहोतून पर्यावरण जागृतीचा विचार प्रकर्षाने मांडला गेला, परंतु आधुनिकीकरणाच्या आणि नागरीकरणाच्या प्रक्रियेत निसर्गघटकांवर आघात होत गेले. त्यामुळे मानवी जीवनाचे नैसर्गिक साधेपण आणि संवाद हरवला.
संतांनी वृक्ष, वल्ली, वर्षा, मेघ, नदी, अरण्ये या सार्या घटकांना कधी सिद्धांत, दृष्टांत, उपमा तर कधी रूपक स्वरूपात मांडून ‘संत साहित्य पर्यावरण विचार’ हे स्वतंत्र दालन उभे केले आणि बाह्यतत्त्व निरुपणाइतकेच निसर्ग–पर्यावरणाचे संकीर्तन त्यातून घडले.
कर्तव्यधर्म, संस्कृती आणि मातृभूमीवरील निष्ठा एकरूप झाल्याशिवाय राष्ट्रभक्ती रुजत नाही ही संकल्पना सर्वात प्रथम भगवान श्रीकृष्णाने मांडली. महाभारत युद्धानंतर या राष्ट्रनिष्ठेच्या जोरावर सार्वभौम सत्ता अस्तित्वात आली. राष्ट्रभावना जागृत ठेवून लोकजीवनात राष्ट्रभक्तीचे चैतन्य जागविण्याचे महत् कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात उभे राहिले. भाषा आणि संस्कृतीची अस्मिता हे राष्ट्रभक्तीचे महत्त्वाचे घटक आहेत, कारण भाषा ही शब्दांच्या अंगाने वसत असते तर संस्कृतीच्या अंगाने ठसत असते. एकीकडे भारताला लाभलेल्या सांस्कृतिक वैविध्याशी एकरूप होणे आणि दुसरीकडे पर्यावरणाचे संतुलन राखणे याची जाणीव या राष्ट्रभक्ती संमेलनातून उभी राहत आहे, असे गौरवोद्गार डॉ. देखणे यांनी काढले.
उद्घाटक स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील म्हणाल्या, राष्ट्रात राहून सामाजिक जाणिवा जपणे गरजेचे आहे. प्रत्येकाने किमान पाच झाडे लावावीत तसेच त्यांना स्वत:च्या मुलांप्रमाणे वाढवावे, असे आवाहन केले. सख्खी मुले आपल्याला सावली देतील की नाही याची शाश्वती नाही पण आपण लावलेली झाडे संवर्धन केली तर ती नक्कीच आपल्याला सावली देतील. पाण्याचा वापर, सीडबँक, देशी वाणाचे जतन करणे याविषयी त्यांनी आवाहन केले.
स्वागताध्यक्ष डॉ. बबन जोगदंड म्हणाले पर्यावरण म्हणजे जीवन आहे. त्याचा जागर होणे गरजेचे आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात असलेली राष्ट्रभक्तीची भावना वाढीस लागावी यासाठी अशा स्वरूपाची साहित्य संमेलने नियमितपणे व्हावीत तसेच वृक्षसंवर्धन, निसर्गसंवर्धन याविषयीचे साहित्य निर्माण व्हावे.
नाईकडे म्हणाले, प्राणवायू हा सजीवाचा पहिला आणि शेवटचा मित्र असतो. तो आयुष्यभर सतत साथ देतो, तो जीवनाचा अविभाज्य भाग आहे. भगवंताने निर्माण केलेली ऑक्सिजनची फॅक्टरी सुरू ठेवण्यासाठी वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे.
तिसर्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. जयश्री तोडकर यांनी डॉ. रामचंद्र देखणे यांच्याकडे संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविली. वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण रक्षण ही देखील राष्ट्रभक्तीच आहे, असा व्यापक विचार समाजामध्ये रुजविणे आणि त्याविषयी जनजागृती करणे या उदात्त हेतूने दरवर्षी संमेलनाचे आयोजन केले जात असल्याचे संमेलनाचे संयोजक चंद्रकांत शहासने यांनी नमूद केले. भविष्यातील ट्रस्टतर्फे राबविण्यात येणार असलेल्या योजनांची माहिती दिली.
उपस्थितांचे स्वागत डॉ. जयश्री तोडकर, मंजिरी शहासने, अॅड. नंदिनी शहासने, विद्याधर चव्हाण, चंद्रकांत शहासने यांनी केले.
महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर वृक्षदिंडी काढण्यात आली. यात मान्यवरांसह शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले.
