कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार नाहीत – शालेय शिक्षण विभाग
मुंबई : केंद्र शासन पुरस्कृत समग्र शिक्षा योजनेअंतर्गत ज्या वस्तीपासून १ किंवा ३ किमी अंतरापर्यंत शाळा उपलब्ध नसेल अशा वस्तीतील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेपर्यंत जाण्यासाठी वाहतूक सुविधा किंवा वाहतूक भत्ता उपलब्ध करून दिली जाते. आतार्यंत वाहतूक भत्ता दिलेली कोणतीही शाळा बंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्य शासन कमी पटसंख्या असलेल्या ३०३७ शाळा बंद करणार, असल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे असून; अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी दिले आहे.
राज्यात ३०७३ वस्त्यापासून जवळ शाळा उपलब्ध नसल्याने त्या वस्त्यांतील विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी पात्र ठरविण्यात आले आहे. सदर शासन निर्णयामधील काही वस्तींपासून शाळांच्या अंतराचा उल्लेख चुकीचा करण्यात आला होता, त्यात आता सुधारणा करण्यात आली असून त्यात वास्तविक अंतर दर्शविण्यात आले आहे.
सदर योजनेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेपर्यंत पोहोचण्यास सहाय्य मिळत आहे. कोणतीही कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा सदर शासन निर्णयाचा उद्देश नाही. केंद्र शासनाच्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. असाच शासन निर्णय दरवर्षी निर्गमित करण्यात येत असल्याचेही कृष्णा यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
