Tuesday, September 15, 2026
Latest NewsMAHARASHTRA

राज्यात १६ डिसेंबरपासून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून आदिशक्ती अभियानाला सुरुवात

मुंबई : देशामध्ये डिसेंबर २०१२ मध्ये निर्भया प्रकरण घडलं , सार्वजनिक ठिकाणी अत्यंत क्रुर आणि हिंसात्मक घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांच्या संकल्पनेतून १६ डिसेंबर पासून राज्यभरात “आदिशक्ती अभियान” उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती आयोगाच्या वतीने देण्यात आली.या अभियानाची सुरुवात रंगशारदा सभागृह , बांद्रा वेस्ट , मुंबई येथे संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत होणार आहे.

स्त्री शिकून कितीही स्वावलंबी झाली, प्रगतीची असंख्य शिखरं तिने पार करुन वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला तरी ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाली किंवा निर्भय झाली असं आजही म्हणता येणार नाही. आजही घरी, कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी महिलांवर अत्याचार होतंच आहेत. राञी अपरात्री काय किंवा दिवसा काय रस्त्याने जाताना महिलांना आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने अनेकदा अङचणींचा सामना करावा लागतो.सामाजिक धोक्यापासून स्वतःची काळजी घ्यावीच लागते. २०१२ साली घडलेलं निर्भया प्रकरण हे सुद्धा अशाच अत्याचारांचं एक हृदयद्रावक उदाहरण. या घटनेला १६ डिसेंबर २०२१ रोजी ९ वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणूनच या निमित्ताने महिला सुरक्षेविषयी एक चळवळ उभी राहावी, याविषयी समाजात जनजागृती व्हावी यासाठी आदिशक्ती अभियान महिला आयोगातर्फे राबवण्यात येणार आहे.या अभियाना अंतर्गत महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली जावी, महिलांमध्ये आत्मविश्वास जागवून त्यांना स्वसंरक्षणाचं महत्त्व पटवून देता यावं या हेतूने महाराष्ट्रभरात हे अभियान राबवण्यात येणार आहे.

या अभियानाच्या अंतर्गत वर्षभर महिलांची सुरक्षितता आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी महिला आयोगाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे, यामध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांची सुरक्षा , घरगुती हिंसाचार , कामाच्या ठिकाणी होणारा मानसिक ञास आणि लैंगिक अत्याचार , कोरोनामध्ये विधवा झालेल्या महिलांचे प्रश्न , शाळकरी मुलींसह तरुणींना सार्वजनिक ठिकाणी होणारा त्रास , महिलांसाठी सायबर सिक्युरिटी , वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांच्या नेतृत्वाला असणारा वाव या सर्व मुद्द्यांवर विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्य महिला आयोगाकडून देण्यात आली.

१६ डिसेंबर रोजी याच सभागृहात “महिलांची सुरक्षितता: काल,आज आणि ऊद्या ” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी हावरे ऊद्योग समुहाच्या अध्यक्षा ऊज्वला हावरे , ऊच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या आणि महिलाविषयी ऊल्लेखनीय काम करणाऱ्या आणि कायदेशीर सल्लागार अॕड. दिव्या चव्हाण , प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ व घरगुती हिंसा व त्याची कारणे या विषयातील तज्ञ, समुपदेशक शिरीषा साठे , कल्पिता पिंपळे ,सहाय्यक आयुक्त महानगरपालिका ठाणे , पुर्णब्रम्ह ऊद्योग समूहाच्या जयंती कठाळे , स्नेहालय संस्थेच्या समन्वयक श्रीमती शुभांगी रोहकाळे ऊपस्थित राहणार आहेत.
यावेळी महिला व बालविकास मंञी  यशोमती ठाकुर ,महाराष्ट्रराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा अॕड. निर्मला सामंत प्रभावळकर ,विधान परिषदेच्या सदस्या प्रा.डॉ.  मनीषा कायंदे यांची उपस्थिती असणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading