खाजगीकरणा विरोधात युवक क्रांती व्हावी – राकेश टिकैत
पुणे :“ सरकारने रोटीला तिजोरीत बंद केले आहे. त्याच्या विरोधात देशातील सर्व शेतकर्यांची ही लढाई आहे. सरकारच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा शेवट काय होईल हे सांगता येणार नाही. शेतकर्याचे आंदोलन हे खाजगी करण्याच्या विरोधात असून शेवटच्या क्षणापर्यंत लढाई लढणार आहे. त्यासाठी देशातील युवकांनी सरकारच्या विरोधात क्रांती करावी,” असे आवाहन भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांनी केले.
भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन ११ व्या भारतीय छात्र संसदच्या आठव्या सत्रात ‘कृषी विधेयकाला विरोध का?’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी आसाम विधानसभेचे उपसभापती डॉ. नमुल मोमीन, ओडिशाचे आमदार प्रभू जानी, भारतीय कृषक समाजाचे अध्यक्ष डॉ. कृष्णा बीर चौधरी आणि महाराष्ट्राचे आमदार देवेंद्र भुयार हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड आणि रवींद्रनाथ पाटील हे उपस्थित होते.
राकेश टिकैत म्हणाले,“ सरकारने देशातील सर्व संस्थांना ताब्यात घेतले आहे. हे असंवैधानिक असून त्या संदर्भात युवकांना जागृत होणे गरजेचे आहे. मॅकडोनल्ड सारख्या ठिकाणी कंपनीचे शोरूम बंद झाल्यावर तेथील वाचलेले अन्न हे फेकले जाते, हे खूप चुकीचे आहे. जेव्हा की देशातील कित्येक व्यक्ती आज रोटीसाठी लढाई करीत आहेत. अशा वेळेस या कंपन्यांचा या खाद्यान्नावर कोणताही अधिकार नाही. देशात जर अश्याच प्रकारच्या आणखी कंपन्या आल्या तर ते घातक ठरतील.”
“या सरकारने देशातील सर्व सरकारी संपत्ती विक्रीस काढल्या आहेत. त्यात मंडी, रेल्वे प्लॅटफॉर्म, बंदरे यासारखे संसाधनांचा समावेश आहे. आज ब्राजील मध्ये शेतकर्यांची जमीन ही कंपन्याच्या हातात आहे. तशीच स्थिती या देशात यायला वेळ लागणार नाही. शेतात केवळ मजूर राहतील. त्यापासून वाचायचे असेल तर आम्हाला जमीन वाचवावी लागेल. देशात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण वाचविणे गरजेचे आहे. हे सर्व करण्यासाठी युवकांनी या आंदोलनात उतरण्याचे आवाहन त्यांनी केले.”