Breaking News – राज्यात ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार
मुंबई: कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा येत्या ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री यांनी कोरोनाचे नियमांचे पालन करुन शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे.
राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुतांश ठिकाणी लसीकरण झाले आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
एक महिन्यापासूनच शाळा सुरु व्हायला पाहिजे होत्या. पण काही अडचणी आल्या. पण येत्या 4 तारखेपासून शाळा सुरु होणार आहेत. त्या त्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून शाळा सुरु केल्या जाणार आहेत. अनेक जिल्ह्यात वातावरण चांगले आहे. पुन्हा कोरोना रुग्ण वाढले तर शाळा सुरु किंवा बंद करण्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार राहतील, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.
