Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

महाराष्ट्राने नेहमीच राजकीय आणि सांस्कृतिक आदर्श प्रस्थापित केला – नितीन गडकरी

पुणेः- महाराष्ट्राने इतर राज्यांच्या तुलनेत नेहमीच राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात नवीन पायंडे पाडले. रामदास फुटाणे यांनी त्यांच्या वात्रटिकांच्या माध्यमातून सर्व पक्षीय टीका केली. परंतु, त्या टिकेमधील तळमळ, ज्याच्यावर टिका झाली त्याच्यापर्यंत देखील पोहोचल्याने त्याला त्याचे कधी वाईट वाटले नाही. रामदास फुटाणे यांनी त्यांच्या वात्रटिकांच्या माध्यमातून इतरांना दुखाण्यापेक्षा त्या वात्रटिकेतील मार्मिकता टिपली, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

वात्रटिकाकार रामदास फुटाणे लिखीत ‘जुनी, नवी पानं’  हा गद्य संग्रह आणि ‘कासा-२०’ या कविता संग्रहाचे प्रकाशन आज नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी दिग्दर्शक नागराज मंजुळे, खासदार गिरीश बापट, सिंबायोसीसचे संस्थापक डॉ. शां.ब. मुजुमदार, यशवंतराव गडाख पाटील, गिरीश गांधी, डाॅ.पी.डी.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी 80 व्या वर्षात नुकतेच पदार्पण केल्यानिमित्त सुशीलकुमार शिंदे आणि मराठी चित्रपट सृष्टीत शंभर कोटींचा व्यवसाय करून दाखवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे तसेच कवींचे प्रतिनिधी या नात्याने ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांचा गडकरी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, फुटाणे यांनी ‘सामना’सारखा चित्रपट तयार करून सर्वसामान्यांविषयी साहित्यिक म्हणून असलेली त्यांची बांधिलकी सिद्ध केली. त्यांचे काव्य सर्वसामान्य माणसांच्या मनाला जाऊन भिडते. त्यांच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीनुसार त्यांचा संत नामदेवांचा वारसा चालवित असल्याचे अधोरेखित होते. सोप्या भाषेत परंतु थेट भाष्य करणे ही त्यांची काव्यशैली आहे.
रामदास फुटाणे म्हणाले की, आजचा ग्रामीण आणि शहरी तरूण भरकटलेला आहे. राजकीय पक्षांचा झेंडा हाती घेऊन त्यांच्या मागे कुठल्या आशेपोटी राबण्यापेक्षा त्यांनी त्यांचे जगण्याचे मार्ग शोधले पाहिजे. मारवाडी, गुजराती, पंजाबी, सिंधी यांना कोणतेही आरक्षण नसतांना यांनी प्रगती करू दाखवली. आपल्या मराठी तरूणांनी त्यांच्या आनंदाच्या आणि जगण्याच्या जागा वेळीच शोधल्या नाहीत, तर त्यांचा भविष्याकाळ अंधःकारमय होईल. आज आपला देश कीर्तनाने सुधरला नाही आणि तमाशाने बिघडला नाही, हे वास्तव असतांना आम्हा कवींच्या कवितांनी मोठे समाजपरिवर्तन घडून येईल, ही खोटी आशा आम्ही बाळगत नाही. आम्ही आमच्या कवितेच्या माध्यमातून केवळ जाणीव करून देण्याचे काम करतो. सभोवतालच्या राजकीय किलकीलाटीत आम्ही एक दिवा घेऊन मार्गक्रमण करीत आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading