माजी मंत्र्याला अशा न्यूज म्हणजे टीआरपीची न्यूज वाटते – चित्रा वाघ
पुणे: यवतमाळ येथील तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. पोलीस अधिक्षकांकडे या महिलेने पोस्टाने तक्रार केली आहे. शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर हे आरोप करण्यात आले आहेत. यवतमाळच्या एसपींनीही तक्रार आल्याचं मान्य केलं आहे. पण महिलेची तक्रार येऊनही तिचा अजून जबाब नोंदवण्यात आला नाही. तिला कोणी विचारणाही केली नाही. पीडित महिलेने संजय राठोड यांनी पतीला नोकरीवर कायम ठेवण्यासाठी शरीरसुखाची मागणी करत शारीरिक, मानसिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटलंय. तर माजी मंत्र्याला अशा न्यूज म्हणजे टीआरपीची न्यूज वाटते. राठोड यांचं विधान धक्कादायक आहे. ही कसली मग्रुरी आहे. हा सत्तेचा माज आहे, असं भाजपच्या चित्रा वाघ म्हणाल्या.
पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, तक्रारीत आरोपींचे स्पष्ट नाव आहे. तिने त्यात घडलेला प्रकार सांगितला आहे .पीडीतीने मदतीची मागणी केलीय. दोन महिन्यांनी फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला, पोलिसांनी का अजून कारवाई केली नाही, असं सांगतानाच हा तोच संजय राठोड आहे. दोन नावे वेगळे नाहीत. तेव्हाचा कॉल सार्वजनिक करा म्हटलं होते. एकाही प्रश्नाला उत्तर मिळालं नाही. आता यवतमाळचे पोलीस काय करताय हे बघायचे आहे, असं त्यांनी सांगितलं. तसेच या प्रकरणात स्यूमोटो कारवाई होत नाही, , हे पोलिसांनी लिहून द्यावं. त्यांनी चालढकल करू नये, असंही त्या म्हणाल्या.
पीडित महिलेने बिनबुडाचे आरोप केलेले नाहीत. तिने रितसर पत्रं लिहिलं आहे, असं सांगतानाच पीडित महिलेशी अद्याप बोलणं झालं नसल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना, संजय आणि महिला हे समीकरण आहे, हे त्यांनाच विचार, असा चिमटाही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना काढला.
उद्धव ठाकरे ही चांगली व्यक्ती आहे. पण मुख्यमंत्रीपदावर गेल्यापासून काही तरी बदल झाला आहे, असा टोला त्यांनी लगावला. परत संजय राठोड दोषी आढळल्यास अशी घाण कोणत्याच सभागृहात नको, असंही त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावरही नाराजी व्यक्त केली. गृहमंत्र्यांनी याप्रकरणी दखल घेणं अपेक्षित आहे. पण दुर्देवाने त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही. महिला प्रश्नावर वळसे-पाटील यांना पत्रं दिलं होतं. त्यावर अजून उत्तर आलेलं नाही. जे करायला हवं ते केलं जात नाही.
