महाराष्ट्राचे लष्करी जवान कैलास पवार सियाचिनमध्ये शहीद
सियाचीन : सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या चिखलीतील कैलास पवार या जवानाला वीरमरण आले आहे. सियाचीनहून आपल्या गावाकडे परतत असताना शहीद झाले. उणे ५० डिग्री तापमान असणाऱ्या खडतर ठिकाणी ते कर्तव्य बजावत होते. महार बटालियनमध्ये ऑगस्ट २०२० पासून ते कार्यरत होते. १ ऑगस्टला त्यांनी एका वर्षाची सेवा संपली होती. सियाचीनच्या बर्फाळ डोंगरावरून खाली उतरत असताना पाय घसरला आणि खाली कोसळले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी लडाखमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांना देवाज्ञा झाली. कैलास शहीद झाल्याची बामी ऐकताच पवार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दिवंगत जवान कैलास पवार यांच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि धाकटी बहीण असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अत्यंत खडतर कर्तव्य बजावल्यानंतर ६ महिन्यांच्या सुट्टीसाठी ते चिखलीला येणार होते. मात्र डोंगर उतरताना झालेल्या दुर्घटनेत त्यांना वीरमरण आलं. वरून खाली येताना पायीच प्रवास करावा लागतो. तेथून खाली उतरण्यासाठी चार दिवस लागतात. यावेळी पाठीवर सामनाचे ओझे घेऊन उतरावं लागतं. पाय घसरून पडल्यानंतर इतर जवानांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
