मराठा आरक्षण – पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही, विनायक मेटे यांचा इशारा
पुणे : मराठा आरक्षणाला न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्यानंतर दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र राज्य सरकारची नेमकी भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच ५ जुलैपासून सुरु होणारं विधिमंडळ अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे.
पुणे येथे शिव संग्राम पक्षाची मराठा आरक्षण बाबत प्रमूख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली. यावेळी भरत लगड विनायक पवार व शिव संग्राम पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
विनायक मेटे म्हणाले, आम्ही 26 जून औरंगाबाद मध्ये आंदोलन करणार दुसऱ्या दिवशी मुंबई मध्ये मोटार बाईक रॅली काढणार आहोत तसेच पुण्यात धरणे आंदोलन करणार आहोत.
राज्य सरकार पुढे काय करणार, याबाबत काही बोलण्यास तयार नाही. यामुळे मराठा समाजातील तरुणांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही राज्याचे अधिवेशन चालू देणार नाही. इंग्रजांनी जी नीती वापरली. तसेच ठाकरे सरकार,अशोक चव्हाण करत आहे. काही लोकांना सोबत घेऊन, हे सरकार वातावरण बिघडवत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. “ठाकरे सरकारने दिल्लीत जाऊन काय केलं, ते स्पष्ट करावं. पुनर्विचार याचिका सुद्धा अद्यापपर्यंत दाखल केली नाही. कसला अभ्यास करत आहेत.”, अशी टीका देखील त्यांनी केली.
पुण्यात शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संभाजीराजे यांच्यात सारथीबाबत बैठक झाली. मात्र हे सरकार संभाजीराजेनाही गोंधळात टाकत असून दिशाभूल करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच शिवाजीमहाराजाच्या स्मारक बद्दल किती निधी उपलब्ध करणार आहे हे सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी मेटे यांनी केली.
