Saturday, September 5, 2026
Latest NewsPUNE

ईद आणि अक्षयतृतीयेनिमित्त शीरखुर्मा व आमरसाच्या भोजनाची १३५ विद्यार्थ्यांना मेजवानी

पुणे : लॉकडाऊनच्या काळात बाहेरगावाहून पुण्यामध्ये शिक्षणासाठी आलेल्या १३५ हून अधिक विद्यार्थ्यांसाठी अविरतपणे भोजनाची व्यवस्था सेवा मित्र मंडळाने केली. त्याला समाजातील अनेकांनी हातभार लावला. मात्र, अक्षयतृतीया आणि ईद एकाच दिवशी आल्याने मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत शीरखुर्मा व आमरसाच्या भोजनाची तब्बल १३५ विद्यार्थ्यांना मेजवानी दिली. मुस्लिम बांधवांसह गणेशोत्सव कार्यकर्त्यांकडून मिळालेली ही भेट स्विकारताना विद्यार्थ्यांच्या चेह-यावर हसू उमलले. 

शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे लॉकडाऊनच्या काळात बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी भोजनसेवा उपक्रम सुरु आहे. त्यामध्ये शुक्रवारी शीरखुर्मा व आमरसाच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. सह धर्मादाय आयुक्त सुधीर बुक्के, उप धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट, अ‍ॅड.प्रताप परदेशी, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, मंडळाचे अध्यक्ष रवींद्र बरिदे आदी उपस्थित होते. ईदनिमित्त शिवाजीनगर वाकडेवाडी येथील मुस्लिम बांधव छोटू शेख, बबर शेखर यांनी भोजन वाटपात सहभाग घेत शीर खुर्मा दिला. यावेळी विद्यार्थ्यांना वाफारा देखील भेट देण्यात आला. 

सुधीर बुक्के म्हणाले, एमपीएससी आणि युपीएससीचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना पोलिस अधिकारी किंवा तहसीलदार व्हायला आवडते. पुण्यामध्ये ही मुले वेगवेगळ्या ठिकाणी रहात असल्याने लॉकडाऊनच्या काळात त्यांच्यासाठी केलेली भोजनाची व्यवस्था हा उपक्रम स्त्युत्य आहे. सेवा मित्र मंडळ ट्रस्टचे सामाजिक क्षेत्रातील योगदान मोठे असून ते काम पाहण्यासाठी मी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. 

मंडळाचे अध्यक्ष रवींद्र बरिदे म्हणाले, कोविडच्या दुस-या लाटेतील लॉकडाऊनच्या सुरुवातीला २५ विद्यार्थ्यांनी भोजनसेवा उपक्रमात सहभाग घेतला होता. त्यानंतर टप्प्याटप्याने यामध्ये वाढत होत २०० विद्यार्थ्यांची नोंद झाली. त्यातील १३५ विद्यार्थी नियमीतपणे दररोज भोजन घेऊन जात आहेत. ही संख्या वाढत असून मंडळातर्फे उत्तम भोजन देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले. मंडळाचे रोहन जाधव, अमर लांडे, विक्रांत मोहिते, महेश भगत, अजय पंडित, अमेय थोपटे, कुणाल जाधव, सचिन ससाणे, उमेश कांबळे , राजाभाऊ कांचन, रवि धायगावे, लाला परदेशी आदींनी आयोजनात सहभाग घेतला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading