Saturday, September 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मागण्या पूर्ण होईपर्यंत उपचार घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांनी पाणी-सलाईनही बंद केली

जालना  : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी रात्रीपासून त्यांनी पाणी आणि सलाईन घेणेही बंद केले असून, सरकारने मागण्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणतेही उपचार स्वीकारणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात ५८ लाख नोंदींची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप या कामाला सुरुवात झालेली नसल्याचा आरोप जरांगे यांनी केला. तसेच हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला लाभ देण्याबाबतही सरकारकडून ठोस निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी म्हटले.
गावागावांत दवंडी देऊन संबंधित नोंदींबाबत माहिती देण्याचे आश्वासनही पूर्ण झालेले नाही, असा दावा त्यांनी केला. याशिवाय २०१२ च्या जात पडताळणी कायद्यात मराठा समाजाचा समावेश करण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी शिष्टमंडळ जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ही भेट अद्याप झालेली नसल्याने प्रश्न कायम असल्याचे जरांगे यांनी नमूद केले.
हैदराबाद गॅझेटच्या वैधतेसह इतर मागण्यांवर ठोस कार्यवाही होत नसल्यानेच उपचार बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जरांगे यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त होत असतानाही ते मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यास तयार नसल्याचे दिसत आहे.
आता सरकारकडून या मागण्यांवर कोणती ठोस पावले उचलली जातात आणि त्यातून आंदोलनावर तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading