महिलांना मनुवाद्यांच्या पिंजऱ्यातून मुक्त करून सन्मानाचे स्थान देणे हेच आपले उद्दिष्ट: राहुल गांधी
छात्रों की गुंज या कार्यक्रमाला युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : महिला, विशेषतः युवती हे देशाचे भविष्य आहे. पुरुषप्रधान मानसिकतेतून त्यांना पिंजऱ्यात कोंडून ठेवण्यात आले आहे. त्यांची पिंजऱ्यातून मुक्तता करू सन्मानाचे स्थान देणे हेच आपले उद्दिष्ट आहे, अशी ग्वाही लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी छात्रों की गुंज या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या तरुणाईला दिली.
देशात पूर्वापार रुजलेल्या पुरुषप्रधान मानसिकतेमुळे, मनुस्मृतीतून घडलेल्या महिलांना नियंत्रित करण्याच्या मानसिकतेमुळे महिलांना सातत्याने नियंत्रित करण्याचे प्रयत्न केले जातात. शारीरिक हिंसा, लैंगिक अत्याचार, वाजवी बंधने, संधी नाकारणे, p सुरक्षेचा अभाव अशा अनेक कारणांनी महिलांना जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न केला जातो, याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.
तब्बल साठ टक्के मुली व महिलांना एकटे घराबाहेर सोडले जात नाही. लग्न अथवा घरकाम यासाठी 45 टक्के मुलींना शिक्षण अथवा नोकरी अर्ध्यावर सोडावी लागते. केवळ आठ टक्के महिलांकडे स्वतःच्या नावावर स्वतःच्या मालकीची मालमत्ता आहे. 85 टक्के महिलांना नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी घरच्यांची परवानगी घ्यावी लागते. त्यांच्या पगारातील किमान 25 टक्के रक्कम घरात द्यावी लागते.लैंगिक अत्याचारांचे प्रमाण कधीच उघड होत नाही. याचे कारण समाजाचा दबाव, बदनामीची भीती आणि न्याय मिळण्याबाबत शाश्वती नसल्याने 99% लैंगिक अत्याचारांच्या प्रकाराची तक्रार दिली जात नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
घरातील मुली 15 ते 29 या वयोगटात दिवसात सरासरी साडेपाच तास घरात काम करतात. मुलांच्या बाबतीत हेच प्रमाण केवळ अर्धा तास असल्याचे पाहायला मिळते. शिक्षण घेत असताना मुलांना तीन-चार वेळा नापास झाले तरीही पुढे शिकण्याची संधी मिळते. मुलींना मात्र लग्न किंवा घरकाम अशी कारणे पुढे करून क्वचित एखादी संधी दिली जाते, याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.
जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनात मुलांनी आणि मुलींनीही शिवीगाळ केली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलींनी शिव्या दिल्यामुळे सांस्कृतिक धक्का बसल्याचे मत व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंग चालक मोहन भागवत म्हणतात की, इंडियात बलात्कार होतात भारतात नाही, त्यांचेच एक नेते बलात्काराच्या 80% प्रकरणात महिला जबाबदार असल्याचे विधान करतात. ही मनुवादी पुरुषी मानसिकता असल्याची टीका गांधी यांनी केली
आजच्या महिला बुद्धिमान आणि कर्तृत्ववान आहेत. त्यांना योग्य तो सन्मान मिळाला पाहिजे. त्यांच्या मनातील भीतीची भावना नष्ट झाली पाहिजे. P त्या देशाचे भवितव्य घडवण्यास समर्थ आहेत. , असेही गांधी म्हणाले.
कार्यक्रमाच्या शेवटी नृत्याच्या तालावर उपस्थित तरुणांनी मोबाईल फोनचे दिवे ऑन करून राहुल गांधी यांना निरोप दिला. या बहुचर्चित कार्यक्रमाला तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. विशेषतः युवती वर्गाची संख्या उल्लेखनीय होती. यापैकी अनेक युवतींनी आपले अनुभव व्यासपीठावर येऊन कथन केले. आदिवासी वसतिगृहात सर्पदशाने झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या एका युवतीने या कार्यक्रमात उपस्थित यांबरोबरच राहुल गांधी यांचेही लक्ष वेधून घेतली. राहुल गांधी यांनी उपोषण स्थळाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच भोजपुरी गायिकेने सादर केलेली व्यवस्थेला सवाल करणारी दोन गाणी लक्षणीय ठरली.
